विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:29 IST2025-06-13T16:25:33+5:302025-06-13T16:29:12+5:30
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर, केंद्र सरकार बोईंग ड्रीमलायनर 787-8 ची उड्डाणे थांबवण्याचा विचार करत आहे.

विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचाअपघात झाला. या अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. यामधील २४१ जण विमानातून प्रवास करत होते, अपघात झालेले हे विमान 'बोईंग ड्रीमलायनर 787-8' हे विमान होते. आता या विमानांबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
'बोईंग ड्रीमलायनर 787-8' या विमानांची उड्डाणे थांबवण्याबाबत भारतीय आणि अमेरिकी एजन्सी या चर्चा करत आहेत. एअर इंडियावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
एअर इंडियाच्या विमानांच्या देखभाल आणि त्याच्या ऑपरेशन प्रक्रियेची देखील चौकशी होऊ शकते.
'एअर इंडिया'वर प्रश्न उपस्थित
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव सनत कौल म्हणाले की, डीजीसीएने एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहून सुरक्षा तपासणीसह इतर त्रुटींबद्दल सूचना दिल्या आहेत. या अपघातानंतर, एअर इंडियावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याआधीही बोईंग 787 ची उड्डाणे थांबवली होती
बोईंग 787 वर बंदी आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही याबाबत चर्चा झाल्या आहेत.२०१३ च्या सुरुवातीला बोईंग 787 च्या लिथियम-आयन बॅटरीला आग लागली होती, त्यानंतर जगभरात या ताफ्यावर ३ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, आता काल झालेल्या अपघातामध्ये जर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड सापडला तर बोईंग 787-8 च्या उड्डाणांवर 2-3 महिने किंवा त्याहून अधिक काळ बंदी घातली जाऊ शकते.
टाटा समुहाने मदत जाहीर केली
एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटी रुपये भरपाई दिली जाईल. म्हणजे विमानात प्रवास करत असलेल्या २४२ लोकांशिवाय अन्य २४ लोकांच्या कुटुंबियांनाही ही मदत दिली जाणार आहे, असं टाटा समुहाने स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे.
जखमींच्या उपचाराचा खर्चही टाटा समुह देणार
अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांच्या उपचारांचा खर्च उचलण्यासोबतच त्यांना पूर्ण मदत आणि आवश्यक काळजी मिळेल याची खात्री टाटा ग्रुपने केली आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठीही आम्ही मदत करू, असंही टाटा समुहाने सांगितले आहे.