'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:19 IST2025-06-20T13:15:51+5:302025-06-20T13:19:59+5:30
Air India : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला.

'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
Air India : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. बोईंगचे विमान येथील एका वसतिगृहावर कोसळले. या अपघातामध्ये आतापर्यंत २७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामधील रोज नवीन माहिती समोर येत आहे.
या घटनेच्या एका आठवड्यानंतर एक खळबळजनक दावा समोर आला आहे. एअर इंडियाच्या दोन वरिष्ठ विमान परिचारिकांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, अहमदाबाद अपघाताच्या एक वर्ष आधी बोईंग 787 ड्रीमलाइनरमधील तांत्रिक बिघाडाची माहिती दोघांनीही एअरलाइनला दिली होती.
तेव्हा एअरलाइनने त्यांना काढून टाकले...
टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, दोन्ही परिचारिकांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, एअरलाइनने केवळ त्यांच्या चिंता फेटाळून लावल्या नाहीत तर त्यांना त्यांचे विधान बदलण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी त्यांचे विधान बदलण्यास नकार दिला तेव्हा एअरलाइनने त्यांना काढून टाकले.
१४ मे २०२४ रोजी ही समस्या उद्भवली होती
या दोन्ही अधिकाऱ्यांनी ड्रीमलाइनरच्या दरवाजात बिघाड झाल्याची तक्रार केल्याचा आरोप केला होता. अहवालानुसार, १४ मे २०२४ रोजी मुंबई-लंडन B787 (VT-ANQ) ही ऑपरेटिंग फ्लाइट AI-129 हीथ्रो येथे डॉक करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. पत्रात म्हटले आहे की, दरवाजा उघडण्यासाठी जबाबदार असलेल्या दोन फ्लाइट अटेंडंटनी तो मॅन्युअल स्थितीत असल्याची पुष्टी करण्यासाठी चेकलिस्ट केली. पण, दरवाजा उघडताच स्लाइड राफ्ट तैनात झाला. दरवाजा ऑटोमॅटिक मोडमध्ये उघडला जातो तेव्हा स्लाइड राफ्ट तैनात होतो. त्यांनी सांगितले की, पायलट आणि केबिन-इनचार्ज यांनी लेखी स्वरूपात दोषाची पुष्टी केली होती.
विमान कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, "आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले पण त्यांनी आमचे म्हणणे बदलण्यासाठी आमच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली."एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी १४ मे २०२४ ची घटना आणि ड्रीमलाइनरच्या दोषांशी संबंधित इतर घटना दडपल्या, असा आरोप त्या पत्रात केला आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांची गंभीरता असूनही, DGCA ने फक्त अनौपचारिक चौकशी सुरू केली आणि तेव्हापासून कोणताही अहवाल शेअर केलेला नाही.