केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 10:22 IST2025-06-29T10:21:58+5:302025-06-29T10:22:29+5:30

Air India Plane: मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Air India flight bound for Chennai lands in Mumbai after smell of burning in cabin | केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्याविमानांमागे लागलेलं संकटाचं शुक्लकाष्ट काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, एअर इंडियाने शनिवारी या घटनेला दुजोरा दिला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान मुंबईत माघारी आणले, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

विमानातील केबिनमधून जळाल्याचा वास आल्यानंतर विमानाला माघारी आणण्यात आलं. तसेच हे विमान मुंबईमध्ये सुखरूपरीत्या उतरलं. त्यानंतर प्रवाशांच्या सोईसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. प्रवशांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, असेही एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

याचप्रमाणे शुक्रवारी एअर इंडियाच्या आणखी एका विमानामध्येही नॉन स्पेसिफिक सिक्युरिटी अलर्ट मिळाला होता. मात्र सुरक्षेच्या सर्व मापदंडांची पडताळणी केल्यानंतर त्या विमानाला पुढील उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

अन्य एका घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दिल्लीहून जम्मूला जात असलेल्या आयएक्स२५६४ या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर दिल्लीला माघारी आणावं लागलं होतं.  हे विमान सकाळी १०.४० वाजता उड्डाण करणार होतं. मात्र ते ११ वाजून ४ मिनिटांनी रवाना झालं. ते १२ वाजून ५ मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होतं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे काही वेळातच त्याला दिल्लीला माघारी आणण्यात आलं.  
-----------------------------------------

Web Title: Air India flight bound for Chennai lands in Mumbai after smell of burning in cabin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.