एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण नाही : एअर चीफ मार्शल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:49 IST2025-05-30T10:42:59+5:302025-05-30T10:49:07+5:30
संरक्षण यंत्रणेत खरेदीतील विलंबाबाबत तीव्र चिंता

एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण नाही : एअर चीफ मार्शल
नवी दिल्ली : एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी संरक्षण यंत्रणेच्या खरेदी आणि वितरणात होणाऱ्या विलंबावर गुरुवारी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी ही समस्या तातडीने सोडविण्याची गरज व्यक्त करीत 'ऑपरेशन सिंदूर' हा 'राष्ट्रीय विजय' असल्याचे गौरवोद्गारही काढले.
एअर चीफ मार्शल म्हणाले, एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही. आपण अशी आश्वासने का देतो जी पूर्ण होऊ शकत नाहीत हा विचार करण्यासारखा विषय आहे. अनेक वेळा, करारावर स्वाक्षरी करताना, आपल्याला माहीत असते की ते वेळेवर होणार नाही, तरीही आपण त्यावर स्वाक्षरी करतो, ज्यामुळे संपूर्ण व्यवस्था बिघडते. एखाद्या लष्करप्रमुखाने अशा प्रकारे यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेत, एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले की, संरक्षण प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे, ऑपरेशनल तयारीवर परिणाम होतो.
नेमके काय झालेय?
अद्याप ४० जेट सैन्याला मिळालेली नाहीत. तर चीनसारखे देश त्यांची ताकद वाढवत आहेत. तेजस एमके१ए लढाऊ विमानासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये एचएएलसोबत ४८,००० कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. मार्च २०२४ पासून डिलिव्हरी सुरू होणार होती; परंतु, आजपर्यंत एकही विमान आलेले नाही.
एअर चीफ म्हणाले...
आपल्याला आजसाठी तयार राहावे लागेल, तरच आपण भविष्यासाठी तयारी करू शकू. जेव्हा आपले सैन्य भक्कम असते तेव्हा युद्धे जिंकली जातात. सैन्याला भक्कम बनविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
आपल्याला सैन्य आणि उद्योग यांच्यात विश्वासाची आवश्यकता आहे. आपल्याला खूप मोकळेपणा दाखवण्याची आवश्यकता आहे. एकदा आपण एखाद्या गोष्टीसाठी वचनबद्ध झालो की आपण ते पूर्ण केले पाहिजे-अमरप्रीत सिंग, एअर चीफ मार्शल
पीओकेतील लोक लवकरच भारतात येतील : राजनाथ सिंह
पीओकेमधील लोक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत आणि तो दिवस दूर नाही जेव्हा ते अंतरात्म्याचा आवाज ऐकतील आणि भारतात परत येतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.