विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आसाममध्ये काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याने सोडला पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:16 IST2026-02-16T14:15:21+5:302026-02-16T14:16:00+5:30
Bhupen Borah leaves Congress: आसाममध्ये दहा वर्षांनंतर राज्याच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी आज सकाळी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आसाममध्ये काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याने सोडला पक्ष
आसाममधील विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली असून, दहा वर्षांनंतर राज्याच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी आज सकाळी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांध यांना पाठवला आहे.
काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भूपेन बोरा यांनी आज सकाळी याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. मी आज सकाळी ८ वाजता काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आता यावर आणखी काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी पक्षाच्या हायकमांडकडून काय प्रतिक्रिया येते, याची मी वाट पाहणार आहे. त्यानंतरच याबाबत काही प्रतिक्रिया देईन, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मी सक्रिय राजकारणामध्ये कार्यरत राहीन. ३२ वर्षे काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता म्हणून राहूनही गेल्या काही दिवसामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मला हे पाऊल उचलावं लागलं आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये भूपेन बोरा यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. मात्र नंतर २०२४ च्या मे महिन्यात त्यांना हटवून प्रदेशाध्यक्षपद गौरव गोगोई यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भूपेन कुमार बोरा यांनी दिलेला राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते हिमंदा बिस्वा सरमा यांनी सांगितले की, भूपेन बोरा यांचा राजीनामा हा अवपेक्षित नाही आहे. भूपेन बोरा हे आमदार किंवा मंत्रिपदावर नसलेले आसाम काँग्रेसमधील शेवटचे नेते होते. एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती राजकाराणात पुढे जाऊ शकत नाही, याचं बोरा यांचा राजीनामा हे प्रतिकात्मक उदाहरण आहे, असा टोलाही सरमा यांनी लगावला.