हल्ल्यानंतर कळाले होते हल्लेखोर कुठे आहेत; ऑपरेशन महादेव अंतर्गत केला खात्मा: गृहमंत्री अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:45 IST2025-07-30T12:43:41+5:302025-07-30T12:45:35+5:30
दहशतवादी हल्ला रोखण्यात गुप्तचर संस्थांना अपयश आले, नेतृत्वाने फक्त श्रेय घ्यायचे नसते, तर जबाबदारीही स्वीकारायची असते : विरोधकांचा टोला

हल्ल्यानंतर कळाले होते हल्लेखोर कुठे आहेत; ऑपरेशन महादेव अंतर्गत केला खात्मा: गृहमंत्री अमित शाह
हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पहलगाम हल्ला २२ एप्रिल रोजी झाला. त्यानंतर एक महिन्याने भारतीय लष्कर, सीआरपीएफ, जम्मू - काश्मीर पोलिसांनी ऑपरेशन महादेव सुरू केले. डाचिगाम येथे दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती इंटेलिजन्स ब्युरोला (आयबी) मिळाली होती. ते तिथे असल्याची पक्की खात्री २२ जुलै रोजी झाली. त्यानंतर ऑपरेशन महादेवचा अंतिम टप्पा पार पाडून तीनही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान सांगितले की, सुलेमान शहा उर्फ हाशिम मुसा, जिब्रान आणि हामजा अफगाणी या तीनही दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांच्याकडून रोमानियन मॉडेल ९० (एकेएमएस) ७.६२ मी रायफल, हायब्रिड रशियन एकेएम ७.६२ असॉल्ट रायफल, अमेरिकन एम४ कमांडो ही शस्त्रे जप्त करण्यात आली. हीच शस्त्रे पहलगाम हल्ल्यातही वापरण्यात आली होती, हे त्यांची तपासणी केल्यानंतर सिद्ध झाले.
काश्मीरमध्ये आता दगडफेकीच्या घटना होत नाहीत शाह म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात सुरक्षा दलांतील १,०६० जवान शहीद झाले. मोदी सरकारच्या काळात हे प्रमाण निम्म्यावर आले आहे. काश्मीरमध्ये एक काळ असा होता की, दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेमध्ये हजारो लोक सामील होत होते. पण, आता तसे काहीही होत नाही. काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर होत असत. त्यात सामान्य नागरिकांचा मृत्यू होत असे. पण, अशा घटना व त्यामुळे होणारे मृत्यू यांची संख्या शुन्यावर आली आहे. जम्मू - काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर तेथील परिस्थिती बदलली आहे.
अमित शाह म्हणाले, बांगलादेश युद्ध जिंकलो, पीओके परत मागितला नाही
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, हे एक मोठे यश होते. मात्र, युद्ध संपल्यानंतर शिमला करारात आपण पाकव्याप्त काश्मीर मागायचे विसरून गेलो. त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला असता तर आज त्याबाबतचा प्रश्न मागे उरलाच नसता. १९७१च्या बांगलादेश युद्धात भारताने पाकिस्तानच्या १९५ अधिकाऱ्यांनाही पकडले होते. त्यांच्यावर खटला चालविणे आवश्यक होते. मात्र, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांनी केलेली विनंती मान्य करून भारताने या अधिकाऱ्यांची सुटका केली. १९६२मध्ये भारताचे चीनशी युद्ध झाले. भारताने अक्साई चीनचा ३० हजार चौरस किमीचा प्रदेश चीनला दिला. त्याबाबत पं. जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत उत्तर दिले की, या भागात गवताचे पातेही उगवत नाही.
ऑपरेशन सिंदूर कठोर कारवाई
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, हशतवादाविरोधात भारत अतिशय कठोर कारवाई करू शकतो हे ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवून दिले. विस्तारवादी भूमिकेतून नव्हे तर स्वसंरक्षणासाठी भारताने इतकी मोठी कारवाई केली. दहशतवादाची पाळेमुळे खणून काढणे हा संदेश या कारवाईद्वारे देण्यात आला. दहशतवादाच्या आडून पाकने छुपे युद्ध खेळू नये यासाठी भारताने ही पावले उचलली. ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर ते थांबवावे, अशी विनंती पाकने केली. त्यावर ही कारवाई स्थगित केली जाईल; पण भविष्यात कारवाया केल्यास ती पुन्हा सुरू करू या अटीवरच भारताने पाकची विनंती मान्य केली.
सुरक्षा त्रुटीची जबाबदारी स्वीकारा
गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे कारण बनलेल्या सुरक्षा त्रुटीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. हल्ल्याचे उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे व याला जबाबदार असणाऱ्यांनी पद सोडले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. खरगे यांनी जम्मूचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या विधानाचा यासाठी आधार घेतला. याला कोण जबाबदार आहे? जे जबाबदार आहेत, त्यांनी पद सोडावे. ते सोडत नाहीत, तर पंतप्रधान कोणती कारवाई करीत आहेत, असा सवालही त्यांनी केला. १९९९मधील कारगिल संघर्षाच्या चौकशीसाठी जशी समिती गठित केली होती, तशी समिती गठित केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.
नड्डा यांना मागावी लागली माफी
राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माफी मागावी लागली. दहशतवादी हल्ल्याला जो कोणी जबाबदार असेल त्याने खुर्ची सोडावी. जर कोणी जबाबदार नसेल तर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, असे खरगे म्हणाले. त्यावर नड्डा म्हणाले की, तुम्ही मानसिक संतुलन गमावल्याने अशा प्रकारे बोलत आहात. यावर खरगे चिडून म्हणाले की, तुमचे मंत्री मानसिक संतुलन हरवून बोलतात. त्यांनी मला मानसिक रुग्ण म्हटले, मी हे सहन करणार नाही. यानंतर नड्डा यांनी माफी मागितली तसेच हे शब्दही हटविण्यात आले.
प्रियांका गांधी म्हणाल्या, युद्ध का थांबवले, सरकारने सांगावे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषणात पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्याशी संबंधित बाबींचा उल्लेख केला; पण पाकिस्तानविरोधातील युद्ध केंद्र सरकारने का थांबविले याचे कारण मात्र सांगितले नाही, अशी टीका खासदार प्रियांका गांधी यांनी केली. नेतृत्वाने फक्त श्रेय घ्यायचे नसते, तर जबाबदारीही स्वीकारायची असते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान एकही विमान पाडण्यात आले नसेल तर तसे स्पष्टपणे संसदेत सांगण्यात अडचण काय आहे? हल्ला रोखण्यात गुप्तचर संस्थांना जे अपयश आले त्याची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली का ? त्या म्हणाल्या की, पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला होणार आहे याची सरकारी यंत्रणांना माहिती नव्हती का? तसे असल्यास ते सरकार व गुप्तचर यंत्रणांचे मोठे अपयश आहे. या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार? भूतकाळातील घटनांबाबत चर्चा नेहमी केली जाते, पण वर्तमानात काय चालले आहे त्याचे उत्तर कोण देणार?
सोनिया गांधींवरील टीकेला प्रत्युत्तर
सोनिया गांधी बाटला हाउस चकमकीत मृत्यू पावलेल्या दहशतवाद्यांसाठी रडल्या असे विधान माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केले होते. त्याचा संदर्भ देऊन शाह यांनी सोनियांवर टीका केली. त्याबाबत प्रियांका म्हणाल्या की, माझ्या आईच्या अश्रूंचा उल्लेख केला गेला. त्याला मी उत्तर देऊ इच्छिते. माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू तिचे पती व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर आले होते.
महाराष्ट्राचे खासदार काय म्हणाले?
अरविंद सावंत, उद्धवसेना : पहलगाम हल्ला झाला तेव्हा सेना किंवा निमलष्करी दलाचा एकही जवान तेथे हजर का नव्हता. पाकची सेना गुडघ्यावर आली असताना युद्धबंदी का केली?
सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी (श.प. गट) : पाकिस्तानचे पितळ जगभरात उघडे पाडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना परदेशात पाठविणे हे पंतप्रधान मोदी यांचे मोठेपण आहे.
सुनील तटकरे, राष्ट्रवादी (अ.प. गट) : ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे कौतुक आहे.
अमर काळे, राष्ट्रवादी (श.प. गट) : भाजपसाठी सर्वप्रथम राष्ट्र आहे. परंतु, वास्तवित व्यवहारात ही बाब दिसून येत नाही. पंतप्रधान सगळीकडे जातात. परंतु, पहलगामला गेले नाहीत.
प्रणिती शिंदे, काँग्रेस : सरकार सत्य लपवून फक्त माध्यमांमध्ये प्रशंसा मिळवत आहे. प्रत्यक्षात, ऑपरेशन सिंदूर हा एक
'तमाशा' होता.
विशाल पाटील : भारत हल्ला करणार याची पाकिस्तानला माहिती असूनही आपल्या जवानांनी हल्ला केला आणि यश मिळविले.