अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:32 IST2024-12-29T15:32:17+5:302024-12-29T15:32:48+5:30
Manmohan Singh: काँग्रेस नेते जयराम रमेश, यांच्या दाव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा
Jairam Ramesh On Dr. Manmohan singh: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी(26 डिसेंबर 2024) दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. तर, शनिवारी (28 डिसेंबर 2024) त्यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर मनमोहन सिंग यांच्या समाधी स्थळावरुन नवा राजकीय वाद पेटला आहे. भाजपने मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. अशातच, आता काँग्रेस सचिव जयराम रमेश यांनी एक धक्कादायक दावा केला होता.
काय आहे जयराम रमेश यांचा दावा?
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश यांनी अशा गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. "2004 मध्ये मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले, त्यावेळी भाजप नेते त्यांच्याशी नीट बोलले नव्हते. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होतील, अशी भाजप नेत्यांना अपेक्षा नव्हती. लालकृष्ण अडवाणींसह भाजपचे इतर नेते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटायला यायचे, तेव्हा त्यांच्यासमोर फायली फेकायचे. तरीदेखी, मनमोहन सिंग यांनी नेहमीच या नेत्यांशी अत्यंत विनम्रपणे चर्चा केली," असा दावा त्यांनी केला आहे.
व्हिडिओ पाहा:-
#WATCH | Delhi | On former PM Dr Manmohan Singh, Congress leader Jairam Ramesh says, "Those who are in power today, who have been singing Dr Manmohan's praises and remembering his contributions for the last two days, should see Dr Manmohan Singh's personality... His 4-minute… pic.twitter.com/cQPI0yOSKs
— ANI (@ANI) December 29, 2024
जयराम रमेश पुढे म्हणाले, "सत्ताधारी आज डॉ. मनमोहन सिंग यांची स्तुती करत आहेत, गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या योगदानाचे स्मरण करत आहेत, त्यांनी आधी मनमोहन सिंग यांचे व्यक्तिमत्त्व पहावे. त्यांच्या नोटाबंदीवरील भाषणाने सरकार हादरले होते. लाला बहादूर शास्त्री यांच्याबद्दल सांगितले जाते की, ते अजातशत्रू होते. मी डॉ. मनमोहन सिंग यांचे वर्णनदेखील तसेच करेन," असंही जयराम रमेश म्हणाले.
काँग्रेसने काय आरोप केला?
"मनमोहनसिंग 10 वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे आजही गरीब व मागासवर्गीयांना मोठे बळ मिळते. आजवर सर्व माजी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार विशिष्ट स्थळी करण्यात आले. मात्र मनमोहनसिंग यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी भाजपप्रणीत सरकारने वेगळी भूमिका घेतली. स्मारक बांधता येईल अशी जागा न निवडता निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय भाजपप्रणीत केंद्र सरकारने घेतला. या सरकारने देशाच्या थोर सुपुत्राचा व पहिल्या शीख पंतप्रधानांचा घोर अपमान केला," असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.
लँडिंगवेळी विमानाला पक्षांच्या थव्याची धडक; दक्षिण कोरियातील अपघाताचे कारण आले समोर