जातनिहाय जनगणनेमुळेच गरिबांची ताकद कळेल; राहुल गांधी यांच्याकडून जोरदार समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:43 IST2023-11-16T10:40:38+5:302023-11-16T10:43:10+5:30
छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत ते बुधवारी बोलत होते.

जातनिहाय जनगणनेमुळेच गरिबांची ताकद कळेल; राहुल गांधी यांच्याकडून जोरदार समर्थन
बेमेतरा : जातनिहाय जनगणना करणे हा निर्णय ऐतिहासिक असेल. यामुळे संपूर्ण देशाचे चित्र बदलून जाईल. यामुळे देशातील ओबीसी आणि गरिबांना त्यांच्या खऱ्या लोकसंख्येविषयी माहिती मिळेल. त्यांना त्यांची शक्ती कळेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा सर्वांत क्रांतिकारी निर्णय असेल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचे जोरदार समर्थन केले.
छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत ते बुधवारी बोलत होते. १७ नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. बुधवारी प्रचाराचा अखेरचा दिवस होता. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना म्हटले की, ओबीसी समाजातून निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जोरदार प्रचार करतात; परंतु जेव्हा ओबीसींना त्यांचे हक्क देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते गप्प बसतात. ते म्हणतात, भारतात जात एकच ती म्हणजे गरिबी.
राहुल गांधी असेही म्हणाले की, नरेंद्र मोदी हे जातनिहाय जनगणना करतील किंवा करणार नाहीत; परंतु, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यास सर्वप्रथम जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर सही केली जाईल. यातूनच गरिबांना त्यांची ताकद समजणार आहे. तुमच्यासोबत राहून तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष हा निर्णय घेणार आहे. आता कोणतीही शक्ती आम्हाला यापासून अडवू शकणार नाही. (वृत्तसंस्था)
शेतकरी, मजूर, युवक अर्थव्यवस्था चालवतात
बड्या उद्योगपतींना कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, आमची सरकारे असलेल्या कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात सर्व मुख्यमंत्र्यांना मी सांगून ठेवले आहे की, जितका पैसा भाजपकडून अब्जाधीश आणि मोठ्या ठेकेदारांना दिला जातो तितका पैसा काँग्रेसला गरीब, मजूर, शेतकरी माता-भगिनींच्या बँक खात्यात जमा करावा लागेल. कारण, आम्हाला माहीत आहे की, देशाची अर्थव्यवस्था शेतकरी, मजूर, लहान दुकानदार आणि युवक चालवतात.