दक्षिणेत तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मित्रपक्षाने साथ सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:11 IST2023-02-02T14:11:10+5:302023-02-02T14:11:45+5:30
BJP News: गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री मोडण्याचे संकेत दिले आहे.

दक्षिणेत तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मित्रपक्षाने साथ सोडली
२०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी केंद्रातील सत्ताधारी भाजपासमोरील आव्हानं वाढताना दिसत आहेत. गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री मोडण्याचे संकेत दिले आहे. तामिळनाडूमध्ये २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपा आणि एआयएडीएमके (ईपीएस गट) यांच्यात मतभेद उफाळून आले आहे. इरोड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी ईपीएस गटाने भाजपापासून स्वत:ला वेगळे केले आहे. तसेच पक्षाच्या कार्यालयावर लागलेल्या पोस्टरमधूनही भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही काढून टाकला आहे.
एवढंच नाही तर एआयएडीएमके (ईपीसएस गट) ने आपल्या आघाडीचं नावही बदललं आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी हे नाव बदलून राष्ट्रीय लोकशाही प्रगतीशील आघाडी असं केलं आहे. या बदलानंतर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानं काही वेळ मौन पाळलं होतं. मात्र आता त्यांनी ईपीएस गटाला प्रत्युत्तर दिलं आहे.
तर एआयडीएमकेच्या एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भाजपावर टीका केली आहे. या नेत्याने भाजपावर टीका करताना एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, ईपीएसने भाजपाला स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपाला तामिळनाडूमधील आपली पात्रता माहिती असली पाहिजे. गेल्या विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी ४ जागा जिंकल्यानंतर भाजपाने स्वत:ला मुख्य विरोधी पक्ष म्हणवून घेण्यास सुरुवात केल्यापासून तामिळनाडूच्या राजकारणात भाजपा आणि ईपीएसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, दिवंगत नेत्या जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये दोन गट आहेत. त्यातील एका गटाचं नाव ओ. पन्निरसेल्वम आहे. तर दुसऱ्या गटाचं नाव ई. पलानीस्वामी आहे. येथे भाजपा ईपीएस गटासोबत आघाडीमध्ये आहे. मात्र इरोडमधील निवडणुकीत ओपीएसने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच भाजपाकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. तसेच भाजपाने आपला उमेदवार उतरवल्यास आपण उमेदवार मागे घेऊ अशी गुगलीही टाकली आहे. ईपीएस आणि भाजपामध्ये वाद सुरू असतानात ओपीएस गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.