मध्यपूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे तिथे राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत ८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून, एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीतून आतापर्यंत तब्बल ५५ लाख भारतीय नागरिक सुखरूप मायदेशी परतले आहेत.
युद्धात भारतीयांचे बळी
परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम आर. महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मध्यपूर्वेतील विविध देशांमध्ये कोट्यवधी भारतीय वास्तव्यास आहेत. अलीकडेच कुवेतमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्रालय सध्या मृत नागरिकांच्या पार्थिवाला भारतात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. बेपत्ता असलेल्या एका भारतीयाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींची कूटनीती आणि मोठी चर्चा
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धाबाबत जागतिक स्तरावर कूटनीतिक प्रयत्न सुरू केले आहेत. २८ मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी व्यापारी जहाजांची सुरक्षा आणि समुद्री मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. तसेच, प्रादेशिक ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारताने निषेध केला आहे.
दूतावास २४ तास सतर्क
"सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर आहे," असे महाजन यांनी स्पष्ट केले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर संबंधित देशांतील भारतीय दूतावास २४ तास कार्यरत असून भारतीयांच्या मदतीसाठी विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, भारत सातत्याने संयम बाळगण्याचे आवाहन करत असून चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच हे युद्ध संपावे, अशी भारताची भूमिका आहे.
५५ लाख भारतीयांची घरवापसी
२८ फेब्रुवारीपासून मध्यपूर्वेतील विविध देशांतून सुमारे ५५ लाख प्रवाशांनी भारतात परतणे पसंत केले आहे. यामध्ये स्थलांतरित कामगार आणि पर्यटकांचा समावेश आहे. सरकारकडून वेळोवेळी 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' जारी करण्यात येत असून भारतीयांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
Web Summary : Middle East conflict claims 8 Indian lives, one missing. 5.5 million Indians safely returned home amid escalating tensions. The government is providing assistance and advocating for peaceful resolution through diplomacy. Embassies are on high alert.
Web Summary : मध्य पूर्व संघर्ष में 8 भारतीयों की मौत, एक लापता। बढ़ते तनाव के बीच 55 लाख भारतीय सुरक्षित घर लौटे। सरकार सहायता प्रदान कर रही है और कूटनीति के माध्यम से शांतिपूर्ण समाधान की वकालत कर रही है। दूतावास हाई अलर्ट पर हैं।