९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:16 IST2026-04-03T17:15:32+5:302026-04-03T17:16:20+5:30
Telangana News: तेलंगाणामधील करीमनगर जिल्ह्यातील गांद्रपल्ली गावातील रहिवासी सध्या प्रचंड भीतीच्या छायेत आहेत. अवघ्या ९० दिवसांमध्ये गावातील सुमारे २८ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर ज्योतिषी आणि पुजाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर गावकऱ्यांनी गाव सोडून जवळच्या जंगलात आश्रय घेतला आहे.

९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...
तेलंगाणामधील करीमनगर जिल्ह्यातील गांद्रपल्ली गावातील रहिवासी सध्या प्रचंड भीतीच्या छायेत आहेत. अवघ्या ९० दिवसांमध्ये गावातील सुमारे २८ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर ज्योतिषी आणि पुजाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर गावकऱ्यांनी गाव सोडून जवळच्या जंगलात आश्रय घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची वर्दळ, सणावारांचा उत्साह यांनी गजबजलेल्या गावा सध्या शुकशुकाट पसरला आहे. सर्वत्र भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण दिसून येत आहे.
गांद्रपल्ली गावामध्ये गेल्या ९० दिवसांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वृद्धांसह काही तरुणांचाही समावेश आहे. या मृत्यूंमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गावात एकापाठोपाठ एक होत असलेल्या मृत्यूंचं कारण ग्रामस्थांना कळत नाही आहे. त्यामुळे अस्वस्थता अधिकच वाढली आहे. सलग तीन महिन्यांपासून गावात सुरू असलेल्या या एकापाठोपाठ एक मृत्यूच्या घटनांमुळे गावावर कुठल्या तरी वाईट शक्तीचं सावट आल्याचं गावकऱ्यांना वाटत आहे. तसेच त्यावर उपाय शोधण्यासाठी गावकऱ्यांनी पुजाऱ्यांचा आश्रय घेतला आहे.
भीतीच्या सावटाखाली असलेल्या गावकऱ्यांनी जेव्हा ज्येष्ठ नागरिक आणि ज्योतिषांची मदत घेतली तेव्हा त्यांना गाव रिकामी करण्याचा सल्ला देण्यात आला. पुजाऱ्याने गावाची कुंडली पाहून केवळ अनुष्ठान आणि जंगलात स्थलांतर केल्यानेच संकट टळेल, असे सांगितले. त्यानंतर गुरुवारी सकाळी सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या घरांना कुलूप ठोकून गुराढोरांना, लहान मुलांना घेऊन जंगलाच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर तिथे पारंपरिक भोजन बनवून देवांची पूजा करण्यात आली.
गावकऱ्यांनी पलायन केल्याने गाव ओसाड पडला आहे. तर तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारे अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्याऐवजी मृत्यूंमागचं खरं कारण शोधलं पाहिजे. हे कारणं पाणी, संसर्ग किंवा भौगोलिक स्थिती हे असू शकतं. सामाजिक कार्यकर्तेही कुठल्यातरी गंभीर आरोग्याच्या समस्येमुळे हे मृत्यू होत असल्याची शंका उपस्थित करत आहेत. २८ मृत्यू हा मोठा आकडा आहे. त्यामुळे गावात वैद्यकीय शिबीर आयोजित करूनन गावकऱ्यांना दूषित पाणी, संसर्ग आणि भौगोलिक कारणांपासून बचावाबाबत जागरूक केलं पाहिजे असं मत ते मांडत आहेत. दुसरीकडे गांद्रपल्ली गावातील रहिवासी आपला गाव पुन्हा एकदा कधी सुरक्षित होईल, याची वाट पाहत आहेत.