खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 11:17 IST2026-04-04T11:15:46+5:302026-04-04T11:17:21+5:30
Artificially Ripened Mangoes Seized: पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश करत फळ विक्रेत्याला केली अटक

खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
Artificially Ripened Mangoes Seized: भारतातील विविध भागात आता हळूहळू फळांचा राजा असलेल्या आंब्याची चाहुल लागली आहे. काही ठिकाणी झलकही पाहायला मिळत आहे. आंब्याचा हंगाम सुरू होत असतानाच, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा एक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हैदराबादमधील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणलेले तब्बल २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे पोलिसांनी जप्त केले असून, याप्रकरणी एका फळ विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.
बनावट प्रकारे आंबा कसा पिकवला?
मिळालेल्या माहितीनुसार, खाद्य सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे शहराच्या विविध भागांत छापे टाकले. या कारवाईदरम्यान कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचे समोर आले. रसायनांच्या मदतीने आंबे वेळेआधीच पिवळेधमक आणि आकर्षक दिसतील असे केले जात होते, जेणेकरून ग्राहकांना आकर्षित करता येईल. पोलिसांनी घटनास्थळावरून २०० किलो आंबे आणि रसायनांची पाकिटे जप्त केली आहेत.
असे आंबे आरोग्यासाठी घातक
या प्रकरणाबद्दल बोलताना, गोशामहल पोलीस ठाण्याचे एसएचओ बी. श्रवण कुमार म्हणाले, “आरोपी आंबे लवकर पिकवण्यासाठी आणि अवैध नफा कमावण्यासाठी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रसायने वापरत होता. अशा कृत्यांमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही बाजारपेठा आणि साठवणुकीच्या ठिकाणी कडक तपासणी सुरू ठेवू.” वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेले आंबे खाल्ल्याने घसा खवखवणे, पोटात दुखणे, उलट्या आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात. दीर्घकाळ अशा फळांचे सेवन केल्यास मज्जासंस्था आणि श्वसनाच्या गंभीर आजारांचा धोका संभवतो.
पोलिसांचे आवाहन
हैदराबाद पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. "नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याचा रंग सर्वत्र एकसारखा नसतो. जर आंबा बाहेरून पूर्णपणे पिवळा आणि आतून कच्चा किंवा चवीला वेगळा लागत असेल, तर तो रसायनांनी पिकवलेला असू शकतो," असे पोलिसांनी सांगितले. ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद वाटल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बाजारातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी अशा अनैतिक मार्गांचा अवलंब करत असल्याने कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.