अहमदाबाद विमानतळावर १९८८ मध्येही झाला होता भीषण अपघात; १३५ पैकी दोघांचाच वाचला होता जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:04 IST2025-06-12T15:56:52+5:302025-06-12T16:04:38+5:30
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. मात्र यापूर्वीही ही अशाच प्रकारची भयावह घटना घडली होती.

अहमदाबाद विमानतळावर १९८८ मध्येही झाला होता भीषण अपघात; १३५ पैकी दोघांचाच वाचला होता जीव
Ahmedabad Plane Crash: गुजरातमधीलअहमदाबाद विमानतळाजवळील मेघनीनगर येथे एक मोठा विमान अपघात झाला आहे. गुजरातमधीलअहमदाबाद येथेन २४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करताच हे विमान कोसळले. गुरुवारी दुपारी मेघनीनगर भागात हा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या भयानक अपघातापूर्वी ३७ वर्षांपूर्वी अहमदाबाद विमानतळावर एक विमान कोसळले होते.
१९ ऑक्टोबर १९८८ रोजी मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानाच्या अपघातात १३३ जणांचा मृत्यू झाला होता. इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट ११३ हे विमान १९ ऑक्टोबर १९८८ रोजी मुंबईहून अहमदाबादला जात होते. अहमदाबाद विमानतळावर पोहोचत असतानाच अपघातात हे विमान कोसळले होते. या अपघातात विमानातील १३५ जणांपैकी १३३ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इंडियन एअरलाइन्सच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता.
डिसेंबर १९७० मध्ये बोईंग ७३७-२०० हे विमान इंडियन एअरलाइन्सला देण्यात आले होते. विमानाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कॅप्टन ओ.एम. डॅले आणि फर्स्ट ऑफिसर दीपक नागपा यांचा समावेश होता. विमान ५.४५ वाजता भारतीय वेळेनुसार निघणार होते परंतु एक प्रवासी न आल्याने २० मिनिटे उशिरा निघाले. विमानाने मुंबईहून ६.०५ वाजता उड्डाण केले आणि ६.२० वाजता कर्मचाऱ्यांनी अहमदाबाद अॅप्रोच कंट्रोलशी संपर्क साधला. दृश्यमानता ६ किमी वरून ३ किमी पर्यंत घसरल्याने पायलटने २३ नंबरच्या धावपट्टीवर लोकलायझर-डीएमई अॅप्रोच घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ६.४७ भारतीय वेळेनुसार विमान अहमदाबादवरून गेले. त्यानंतर ६.५० वाजता ते पुन्हा अहमदाबादकडे वळे. विमानाचा एटीसीशी झालेला हा शेवटचा संपर्क होता.
विमान कर्मचाऱ्यांनी उतरण्यासाठी कोणतीही परवानगी मागितली नव्हती. तसेच त्यांनी १,००० फूट (३०० मीटर) नंतर कॉल-आउट दिले नाहीत. विमान १६० नॉट्स (३०० किमी/तास; १८० मैल प्रति तास) वेगाने प्रवास करत होते. हा वेग जास्त होता आणि पायलटने धावपट्टी पाहिल्याशिवाय ५०० फूट खाली उतरायला नको होते. पायलट आणि सह-पायलट यांच्यातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर संभाषणातून असे दिसून आले की दोघेही धावपट्टी पाहण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी लँडिंगचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. धावपट्टी पाहण्याच्या प्रयत्नात त्यांचा अंदाज चुकला. दोन्ही पायलट अल्टिमीटरकडे लक्ष न देता धावपट्टीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत होते. ६ वाजून ५३ मिनिटांनी विमान झाडांवर आणि एका विजेच्या खांबावर आदळले. त्यानंतर अहमदाबादजवळील नोबल नगर हाऊसिंग सोसायटीजवळील चिलोडा कोतारपूर गावाच्या बाहेरील भागात कोसळले. अपघातस्थळ २३ नंबरच्या धावपट्टीच्या अप्रोच एंडपासून २,५४० मीटर अंतरावर होते.