नाशिक : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर व त्या अनुषंगाने नाशिकला पक्ष संघटना बळकट करण्यासाठी येणार असल्याचे राज ठाकरे यांनी आगाऊ घोषित करणे, पदाधिकारी दौऱ्याच्या तयारीला लागलेले असतानाच वसंत गिते यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा देणे व पूर्वसंध्येलाच ठाकरे यांचा नियोजित दौराही रद्द होणे या तिन्ही घटना निव्वळ योगायोग की दोघांनीही एकमेकांच्या समजुतीने घेतलेले निर्णय आहेत याविषयी मनसैनिक बुचकळ्यात पडले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसैनिकांचे मनोर्धेर्य खच्ची होऊ नये व पक्ष संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर निघण्याची घोषणा चार दिवसांपूर्वीच केली असल्याने नाशकातील मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. ठाकरे तब्बल तीन दिवस नाशिक मुक्कामी थांबून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येऊन या दौऱ्याची तयारीही केली जात होती; परंतु रविवारी कन्येला झालेल्या किरकोळ अपघातामुळे ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा रद्द केल्याचे जाहीर केले व सोमवारी सकाळी वसंत गिते, सचिन ठाकरे यांनी पदांचे राजीनामे दिले. यामुळे या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जात आहे. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येण्याच्या दिवशीच पदांचे राजीनामे देऊन दबावतंत्र वापरण्याचे व दौऱ्यात राजी-नाराजीचे नाट्य घडविण्याचे पदाधिकाऱ्यांनी ठरविले होते की काय अशी शंका घेतली जात असून, कदाचित पक्षप्रमुख राज ठाकरे यांना याची कुणकुण अगोदरच लागल्यामुळे त्यांनीच स्वत:हून दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्यांच्या स्थानिक निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दौऱ्यावर निघणाऱ्या ठाकरे यांच्या झोळीत एकेकाळी तीन आमदार व चाळीस नगरसेवक देणाऱ्या नाशकातून पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन दौऱ्याला अपशकुन होऊ नये म्हणूनही ठाकरे यांनी दौरा लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा निव्वळ योगायोग की?
By admin | Updated: November 4, 2014 00:26 IST