Vidhan sabha 2019: वंचित की काँग्रेस? डाव्यांचं ठरलंय, पण कुणासोबत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 06:36 PM2019-09-24T18:36:28+5:302019-09-24T18:38:30+5:30

देशाच्या राजकारणात डाव्या पक्षांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे.

Vidhan sabha 2019: vanchit bahujan aghadi or Congress? Left to decide, but with whom? | Vidhan sabha 2019: वंचित की काँग्रेस? डाव्यांचं ठरलंय, पण कुणासोबत?

Vidhan sabha 2019: वंचित की काँग्रेस? डाव्यांचं ठरलंय, पण कुणासोबत?

Next

- धनंजय वाखारे

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीचं ठरलंय, युतीचं ठरतंय, वंचित-एमआयएमचे बिनसलंय... अशा वार्ता येत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात थेट पहिल्या पंचवार्षिक निवडणुकांपासून संचार करणाऱ्या डाव्या चळवळीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) यांच्यातही ठरल्याच्या चर्चा होत आहेत. परंतु हे डावे पक्ष  काँग्रेस आघाडी की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीसोबत जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी लढविलेल्या ५३ जागांपैकी अवघ्या एका जागेवर विजय मिळविता आला आणि ती जागा होती नाशिक जिल्ह्यातील कळवण विधानसभा मतदारसंघातील. आता डाव्या चळवळीतील माकपाने आपल्या ताकदीनुसार पाच जागा लढविण्याचे ठरविले असून, निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमधून कोणाचा सांगावा येतो, याची प्रतीक्षा केली जात आहे.

देशाच्या राजकारणात डाव्या पक्षांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. विशेषत: पश्चिम बंगालमध्ये या पक्षाने दीर्घकाळ सत्तेची चव चाखली. महाराष्ट्राच्या राजकारणातही भाकप-माकपा या दोन्ही पक्षांनी शिरकाव केलेला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाकपने उमेदवार उभे केले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्किस्ट) अर्थात माकपा १९६७ पासून निवडणुकीला सामोरी गेली. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि चांदवड-देवळा या भागात डाव्या चळवळीचा प्रभाव राहिलेला आहे.

नाशिक जिल्ह्यातून १९७८ मध्ये पहिल्यांदा माकपाच्या उमेदवाराला विधानसभेत पाऊल ठेवता आले. त्यावेळी सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून जिवा पांडू गावित यांनी उमेदवारी करत ७५२७ मते मिळविली. त्यांनी अपक्ष असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा एकदा जे. पी. गावित यांनी विजय संपादन करत इंदिरा काँग्रेसचे सीताराम भोये यांना पराभवाची धूळ चारली. त्यावेळी गावित यांनी १८ हजार ८३४ मते घेतली होती.

१९८५ च्या निवडणुकीत मात्र भाकप आणि माकपा या दोन्ही पक्षांना विधानसभेत प्रतिनिधी पाठविण्याची संधी मिळाली. या निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून माधवराव गायकवाड यांनी समाजवादी काँग्रेसचे कन्हैयालाल नहार यांचा पराभव केला, तर सुरगाण्यामधून जे. पी. गावित यांनी हॅट्ट्रिक साधली. गावित यांनी कॉँग्रेसचे झामरु मंगळू कहांडोळे यांचा पराभव केला होता.



१९९० मध्ये सुरगाण्यातून चौथ्यांदा जे.पी. गावित विधानसभेवर गेले. त्यांनी काँग्रेसचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सीताराम भोये यांचा पुन्हा एकदा पराभव केला. १९९५ च्या निवडणुकीत मात्र जे. पी. गावित यांच्या विजयाची घोडदौड रोखली गेली. अपक्ष उमेदवारी करणा-या हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा जे. पी. गावित विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीकडून लढणा-या हरिश्चंद्र चव्हाण यांचा पराभव केला. २००४ च्या निवडणुकीत जे.पी. गावित यांनी विजय संपादन करत सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे भास्कर गावित यांचा पराभव केला होता.

शिवसेनेने त्यावेळी ५ हजार ६५८ मते घेत माकपाला घाम फोडला होता. २००९ च्या निवडणुकीत मतदारसंघांची पुनर्रचना होऊन कळवण-सुरगाणा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे अर्जुन तुळशीराम पवार यांच्याकडून जे. पी. गावित पराभूत झाले. पवार यांनी ७४ हजार १५२ मते घेतली, तर गावित यांना ५८ हजार ३९ मते मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत जे. पी. गावित हे विजयी होऊन त्यांनी सातव्यांदा विधानसभा गाठली. यावेळी राष्ट्रवादीचे अर्जुन पवार यांचा त्यांनी अवघ्या ४६१७ मतांच्या फरकाने पराभव केला.

२०१४ मध्ये सर्वत्र मोदी लाट असतानाही कळवण-सुरगाणा मतदारसंघातून डाव्यांनी जे. पी. गावित यांच्या रूपाने विधानसभेत आपले अस्तित्व जागते ठेवले. २०१४ मध्ये माकपाने राज्यात २० जागा लढविल्या होत्या. त्यांना ०.३९ टक्के मते मिळविता आली होती, तर भाकपने ३३ जागा लढवित ०.१३ टक्के मते घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीसाठी माकपाने ५ जागांवर लढण्याची तयारी चालविली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा, नाशिक पश्चिम यासह पालघर, डहाणू या जागांचा समावेश आहे. निवडणुकीत युती-आघाडीचं ठरत असताना डाव्यांनीही वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आघाडी हे दोन पर्याय समोर ठेवले असून, त्यापैकी कोण प्रतिसाद देतो, यावरच पार्टीची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.

Web Title: Vidhan sabha 2019: vanchit bahujan aghadi or Congress? Left to decide, but with whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.