तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना चार दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:07 IST2020-06-28T20:01:52+5:302020-06-28T20:07:28+5:30
नाशिकरोच्या जेलरोड परिसराच प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खुन झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या तिघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना चार दिवसांची कोठडी
नाशिक : नाशिकरोड भागात प्रेमप्रकरणातून जेलरोड येथील सागर अहिरे याचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तीनही संशयितांना उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले होते. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जेलरोड धारबळे मळा, विठ्ठलनगर येथील सागर संदीप अहिरे (१९) याचा शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जेलरोड दसक शिवार करंजकरनगर समोरील गोदावरी नदी पात्रात गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. खुनाची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मयत सागरची ओळख पटताच उपनगर पोलिसांनी सर्वपातळीवर तपास करण्यास सुरु वात केली होती. सहायक निरीक्षक संतोष खडके, के. टी. गोडसे, विलास गिते, किरण देशमुख, राहुल खांडबहाले यांनी अवघ्या दोन तासांत संशयित अजय दीपक जाधव (२०), राकेश नाना घुमरे (१९) आणि राहुल उर्फ रोमिओ राजेश राहटळ (२१ सर्व रा. जेलरोड शिवाजीनगर) यांना पकडले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सागरचा खून केल्याची कबुली दिली. या तिघांपैकी एकाच्या बहिणीला सागरने प्रेमाची मागणी घातली होती. ही बाब तिच्या भावाला समजल्यानंतर तो संतापला होता. शनिवारी सायंकाळी राकेश घुमरे, राहुल राहटळ, अजय जाधव यांनी सागरला बरोबर घेऊन जेलरोड दसक शिवार करंजकरनगरसमोरील गोदावरी नदीपात्राच्या कडेला झुडपात सर्वांनी मद्यपान केले. तेथे लपवलेला कोयता काढून सागरच्या मान, डोक्यावर वार करून पलायन केले.या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला. सागरला या तिघांसोबत अन्य मित्रांनी पाहिले होते. केवळ तेवढ्या गोष्टीचा आधार घेत पोलिसांनी हल्लेखोरांना दोन तासांत अटक केली. रविवारी तिघा संशयितांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.