भाजपने नवा चेहरा सुचवल्याची चर्चा; मात्र श्रीकांत शिंदेंनी सर्वांसमोर जाहीर केली खासदाराला उमेदवारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 00:08 IST2024-03-13T00:06:55+5:302024-03-13T00:08:48+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या एका उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे.

भाजपने नवा चेहरा सुचवल्याची चर्चा; मात्र श्रीकांत शिंदेंनी सर्वांसमोर जाहीर केली खासदाराला उमेदवारी!
Shivsena Shrikant Shinde ( Marathi News ) : महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप ३० हून अधिक जागा लढवण्यावर ठाम असून शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे अद्याप जागावाटप झाले नसल्याने उमेदवारांची घोषणाही रखडली आहे. मात्र असं असताना शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या एका उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे. नाशिक दौऱ्यावर गेलेल्या श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं स्पष्ट केलं आहे.
नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, "हेमंत गोडसे यांना आपल्याला तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचं आहे. दुसऱ्या कोणाचे नाव नाही. महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार आणायचे आहेत आणि त्यात हेमंत गोडसे पण असतील," असं सूचक वक्तव्य श्रीकांत शिंदेंनी केलं आहे. "हेमंत आप्पा तुमचा धनुष्यबाणच नाशिकला राहणार आहे. आपली कामे बघून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे," असंही यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले.
एकीकडे नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना दूर करून शिवसेनेनं नवीन उमेदवार द्यावा, असं भाजपकडून सुचवण्यात आल्याची चर्चा असतानाच श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा गोडसे हेच उमेदवार असतील असं सांगितल्याने आता याबाबत भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून इच्छुक असणाऱ्या जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य शांतिगिरी महाराज यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निमंत्रण आल्याने शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट नाशिकमध्ये नव्या समीकरणांची नांदी ठरणार का, अशीही चर्चा रंगत होती.