अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:48 IST2023-03-10T14:30:30+5:302023-03-10T14:48:41+5:30
पालकमंत्र्यांचा मदत कार्यासाठी ठिय्या मांडला होता : दोन पथकाकडून शोधमोहीम सुरू होती, अखेर २० तासांनी जवानाचा मृतदेह सापडला

अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा
शैलेश कर्पे
सिन्नर (जि. नाशिक) : पत्नी व मुलांसह दुचाकीहून जाणाऱ्या केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली होती. यात जवानाच्या पत्नी व दोन मुलांना वाचविण्यात यश आले होते. तर बेपत्ता जवानाचा गेल्या २० तासांपासून शोध सुरू होता. पालकमंत्री पालकमंत्री दादा भुसे यांनी मदतकार्यासाठी एक तासापासून घटनास्थळी ठाण मांडले. त्यांनी अजून बचाव पथकांना पाचारण करण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. अखेर, साडे वीस तासानंतर अर्धा किमी अंतरावर बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान, पाटाचे पाणी लवकर बंद न केल्याने ग्रामस्थ व जवानाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
गणेश सुकदेव गिते (३६) रा. मेंढी, ता. सिन्नर असे या जवानाचे नाव असून ते पत्नी, मुलांसह गावाकडे दुचाकीने येत असताना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील चोंढी शिवारात सदर प्रकार घडला. मेंढी येथील गणेश सुकदेव गिते हा केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत असून पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात आहे. २४ फेब्रुवारी रोजी तो सुट्टीवर आला होता. बुधवारी (दि.८) गणेश हा पत्नी रुपाली गणेश गिते (३०) मुलगी कस्तुरी गणेश गिते (७) व मुलगा अभिराज गणेश गिते (दीड वर्षे) यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी दुचाकीने गेला होता. शिर्डीहून मोटारसायकलने परतत असताना नांदूरमध्यमेश्वर धरणातून गेलेल्या उजव्या कालव्याच्या बाजूने चोंढी शिवारात असलेल्या घराकडे जात असताना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मेंढी ब्राह्मणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात गणेशचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल उजव्या कालव्यात पडली. कालव्याला आवर्तन सुटलेले असल्याने मोटारसायकल पडण्याचा आवाज होताच जवळच असलेल्या नितीन रावसाहेब गिते याने धाव घेतली. पाण्यात पडल्यानंतर गणेश व नितीनने गणेशची पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी व मुलगा अभिराज यांना बाहेर काढले, मात्र पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेला. घटनेनंतर आदिवासी बांधवांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गणेशचा शोध सुरू केला. दुपारी एक वाजेच्या सुमारास पालकमंत्री घटनास्थळी हजर झाली. घटनास्थळी प्रांताधिकारी अर्चना पठारे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे तहसीलदार एकनाथ बंगाळे यांचा सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात होता. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कालव्याचे पाणी बंद करण्यात आले.कालव्याची पाणी कमी होऊ लागल्यानंतर शोध मोहिमेला वेग आला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नाफेड ची बैठक आणि निफाड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा रद्द करून तातडीने सिन्नरला धाव घेतल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. आपण मागच्या सरकारमध्ये सैनिक कल्याण विभाग सांभाळला आहे. सैनिकांप्रती असणाऱ्या आदरभावामुळेच सर्व बैठका रद्द करून परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः आलो जोपर्यंत बेपत्ता जवानाचे सापडत नाही तोपर्यंत आपण स्वतः इथेच थांबणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले होते. अखेर, साडे वीस तासांच्या प्रयत्नानंतर जवानाचा मृतदेह आढळून आला.