वर्षा सहलीवर प्रश्नचिन्ह : निसर्गरम्य ठिकाणी वनपर्यटनावर बंदी 'जैसे-थे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:38 IST2020-06-09T20:35:48+5:302020-06-09T20:38:41+5:30
नाशिक वन्यजीव विभागाकडूनदेखील नाशिक वनवृत्तातील तीनही जिल्ह्यांमधील अभयारण्ये, राखीव वनांची वाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. जुनअखेरपर्यंत प्रवेश बंद कायम राहणार

वर्षा सहलीवर प्रश्नचिन्ह : निसर्गरम्य ठिकाणी वनपर्यटनावर बंदी 'जैसे-थे'
नाशिक : राज्य सरकारकडून ‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत अनलॉकची घोषणा केली गेली असून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून अभयारण्य, राखीव वनांमध्ये प्रवेश देण्याबाबतचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नसल्याने नाशिक वनवृत्तातील नाशिक, अहमदनगर, धुळे या जिल्ह्यांतील सर्वच अभयारण्यांसह राखीव वनांमध्ये ‘टाळेबंदी’ कायम असल्याचे नाशिक वन्यजीव विभागाच्या सुत्रांनी सांगितले. यामुळे वर्षासहलीवरदेखील सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचे चार टप्पे पुर्ण करण्यात आले आहे. तेव्हापासून अद्याप नाशिक वन्यजीव विभागाकडूनदेखील नाशिक वनवृत्तातील तीनही जिल्ह्यांमधील अभयारण्ये, राखीव वनांची वाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. जुनअखेरपर्यंत प्रवेश बंद कायम राहणार असल्याचे नाशिक वनवृत्ताचे प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले.
जुन महिना सुरू झाला असून पावसाळ्याचे दिवसही उजाडले आहे. मागील दोन महिन्यांपासून नागरिकदेखील घरात बंदिस्त आहेत. कोरोना आजाराच्या संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊनची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. पावसाळ्यात वर्षासहलीचे बेत आखण्यास नागरिकांची सुरूवात झाली असून घरात बसून आलेला शीण घालविण्यासाठी नागरिकांना निसर्गरम्य ठिकाणी डोंगररांगांवर फेसाळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेला नयनरम्य परिसरात पर्यटनाची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार पावसाळी पर्यटनाचे बेत आखले जात आहेत; मात्र जुनअखेरपर्यंततरी वनविभाग व वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत असलेल्या कुठल्याही राखीव वनांसह अभयारण्ये, गड-किल्ल्यांच्या परिसरात ट्रेकिंगसाठीदेखील जाता येणार नाही. कारण अद्याप याबाबत नवीन आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून प्राप्त झालेला नाही.