नाशिक महापालिका निवडणूक : प्रभागरचनेत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचीच रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:29 IST2025-06-13T18:27:07+5:302025-06-13T18:29:01+5:30
Nashik Municipal Election News in MarathiL: नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकारण तापू लागले आहे. नाशिकमध्ये महायुतीतही अंतर्गतही बऱ्याच राजकीय घटना घडत आहेत.

नाशिक महापालिका निवडणूक : प्रभागरचनेत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचीच रस्सीखेच
Nashik Municipal Elections:महापालिकेची प्रभागरचना अनुकूल असेल तर महापालिकेतील विजय सोपा मानला जातो, त्यामुळे प्रशासनाने कितीही निरपेक्षपणे काम करण्याचा प्रयत्न केला तरी प्रभाग रचनेवर अप्रत्यक्षरीत्या राजकीय दबाव असतोच. यंदा राज्यात महायुतीची सत्ता असली तरी भाजपला नाशिकची सत्ता पुन्हा हवी असल्याने त्यादृष्टीने व्यूहरचना केली जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शिंदेसेनेकडूनही त्या दृष्टीनेच पावले टाकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्सीखेच वाढण्याची शक्यता आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाशिक महापालिकेच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या असून त्या दृष्टीने शासनाने निवडणूक कार्यक्रम देखील घोषीत केला आहे. ११ ते १६ जून दरम्यान प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रगणक गट तयार करावे लागणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही नंतर करण्यात येणार आहे.
२२ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २५ दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र, प्रशासकीय तयारीबरोबरच ही राजकीय लढाईची देखील तयारी असण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये भाजपा-शिवसेनेचे सरकार असताना भाजपाने चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती. त्याचा फायदा भाजपाला झाला होता. आणि ६६ नगरसेवक निवडून आले होते तर शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळेच २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भाजप सरकारची राज्यातील प्रभाग रचना रद्द केली होती.
आता तीन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची मुदत संपल्यानंतर प्रभाग रचना तयार करण्यात येणार होती. त्यावेळी आधी दोन आणि नंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना करताना देखील महापालिकेतील अनेक बाहुबली नगरसेवक तसेच काही राजकीय नेत्यांनी आपल्या सोयीची प्रभाग रचना तयार केल्याचा आरोप होत होता.
आपल्या पॅनलचे आणि सोयीचे नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रचंड प्रभाग रचनेत बदल करण्यात आला होता. अशा प्रकारच्या चर्चा होत होत्या.
यंदा मात्र, राज्यात महायुतीचे सरकार असले तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या प्रभागरचनेवर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सूत्रे असल्याने भाजपचे स्थानिक नेते त्यामुळे वेगवेगळे दावे करत आहेत. तर दुसरीकडे नगरविकास खात्याची सूत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेवर प्रभाव कोणाचा यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
प्रभागरचनेचा असा आहे कार्यक्रम
प्रगणक गटांची मांडणी करणे व प्रारूप प्रभागरचना करणे- ११ ते १६ जून २०२५
जनगणनेची माहिती तपासणे १७ ते १८ जून
स्थळ पहाणी १९ ते २३ जून, प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवणे - ४ ते ८ जुलै
प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवणे - १५ ते २१ जुलै
प्राप्त हरकतींवर सुनावणी घेणे- २२ ते ३१ जुलै,
अंतिम प्रारूप प्रभागरचना निवडणूक आयोगला पाठवणे- १ ते ७ ऑगस्ट
अंतिम प्रभागरचनेची राजपत्रात प्रसिद्धी- २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर