बिबट्याचा संचार : पिंजरे, ड्रोन अन् सावज बदल असे सगळेच प्रयोग निष्फळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:20 IST2020-06-25T18:11:20+5:302020-06-25T18:20:51+5:30
मानवाने हे वास्तव स्विकारण्याची गरज आहे. सहजिवन, सहचरण हाच वन्यप्राणी-मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो.

संग्रहित छायाचित्र
नाशिक : तालुक्यातील दारणाकाठालगतच्या दोनवाडे ते भगुर गावापर्यंतच्या पंचक्रोशीत सध्या दोन आठवड्यांपासून बिबट या वन्यप्राण्याचा धुमाकूळ सुरू आहे. बिबट-मानव संघर्ष या भागात उभा राहताना दिसून येत आहे. हा संघर्ष रोखण्यासाठी नाशिकवनविभागाकडून सातत्याने विविध स्तरावर प्रयोग अन् प्रयत्न केले जात आहेत; मात्र अद्याप वनविभागाचा कुठलाही प्रयोग यशस्वी होऊ शकतलेला नाही. दारणाकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असल्याचे शेतकरी सांगतात.
एप्रिलमध्ये हिंगणवेढेत बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा बळी गेला तर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोनवाडे गावात चारवर्षीय बालक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावला. यानंतर काही दिवसांनी पुन्हा बिबट्याने दोनवाडेत एका वृध्दाला ठार मारले. शेवगेदारणात एका चिमुकलीला बिबट्याने थेट अंगणात येऊन पंजा मारला, सुदैवाने तीचे प्राण वाचले; मात्र बाबळेश्वरमध्ये तीन वर्षीय चिमुकलीला बिबट्याच्या हल्ल्यात नुकतेच प्राण गमवावे लागले. यामुळे या दारणाकाठालगतच्या पंचक्रोशीत बिबट वन्यप्राण्याची कमालीची दहशत निर्माण झाली आहे. पळसे गावातील टेंभी मळा असो किंवा एकलहरे सामनगाव रस्ता असो किंवा मग भगूर-दोनवाडे गावाचा रस्ता असो, या भागात कधी ऊसशेतीत भरदिवसा बिबट दर्शन देतो तर कधी रात्रीच्या सुमारासही शेतकऱ्यांना बिबट्याची भटकंती नजरेस पडते.
बिबट्याला जेरबंद करण्याकरिता व बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी दोघांच्या जीवांच्यादृष्टीने विविध उपाययोजना वनविभाग करत आहेत.
जिल्ह्यात बिबट-मानव संघर्ष कमी होण्यामागे सर्वश्रूत कारण म्हणजे जंगलांचा दिवसेंदिवस होणारा -हास आहे. जंगलांचा -हास हा मानवाकडूनच त्याच्या काही गरजा भागविताना कळत-नकळत होत गेला; परंतू त्याच्या गंभीर परिणामांचा मानवाने यापुर्वी कधीही विचार केला नाही. मानवाने हे वास्तव स्विकारण्याची गरज आहे. सहजिवन, सहचरण हाच वन्यप्राणी-मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो
जंगलांमध्ये होणारे अतिक्रमणदेखील याला कारणीभूत आहेत. वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक क्षेत्रात मानवाने केलेले हस्तक्षेप घातक ठरू लागला आहे. कृत्रिमरित्या वणवाही जंगलांच्याभोवती पेटविला जातो आहे. मानवाच्या हव्यासापोटी केलेल्या चूकांची ही एक शिक्षाच आहे, असे म्हणणेच चुकीचे होणार आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी वनक्षेत्राचे संवर्धन करणे मानवाच्या हातात आहेत. अवैध शिकार, अवैध वृक्षतोड मानवाने थांबविली पाहिजे आणि निसर्ग जपला पाहिजे, असे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर व उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.