नाशिक : 3 वर्षांपूर्वी साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीसाठी घटना बदलली. मात्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत डॉ. जयंत नारळीकर आले असते तर बरं झालं असतं, असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील व्यक्त केले. नाशिक येथे होत असलेल्या ९४ वे अखिल भारतीय मराठी संमेलनात ते बोलत होते.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, उस्मानाबाद साहित्य संमेलनात मणक्याचं दुखणं असतांना फादर फ्रान्सिस दिब्रेटो आले होते. आपल्यासाठी अनेक लोक येणार हे जाणून फादर दिब्रेटो आले होते. मला नारळीकर यांना दोष द्यायचा नाही. मात्र, त्यांची सर्व तयारी करण्याचं ठरवूनही ते आले नाही. यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला वेगळी किनार लागली. आता पुन्हा घटना बदलावी ही आमची इच्छा असल्याचेही कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.
आजचा समाज काही बाबतीत सोयीनं वागतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेलिब्रिटी मौन पाळतात. राजकारणी शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्दयपणे वागतात. म्हणून या प्रश्नावर परिसंवाद घेतला आहे. आजकालचे ग्रंथ उदबोधक असतात असे नाही. जात पात आमच्या मनात येत नाही. आमची एकच भाषा म्हणजे साहित्य आहे. नाशिक साहित्य संमेलनात हा प्रश्न उपस्थित झाला, याचा मला खेद वाटतो. जात पात विषयावर साहित्य संमेलन जितक वेठीस धरल गेलं, तितकं कुठलंच संमेलन वेठीला धरलं गेलं नाही. याचा मला खेद वाटतो, असंही कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.
ते म्हणाले की, तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे.समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळुवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.