भगूर, इंदिरानगर, सातपूरसह शहरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 18:22 IST2019-09-25T18:17:50+5:302019-09-25T18:22:24+5:30
पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचले होते. यामुळे नागरिकांना खड्डयांचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. बहुतांश वाहनचालकांना खड्डयांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली.

भगूर, इंदिरानगर, सातपूरसह शहरात जोरदार पाऊस
नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.२५) दुपारी जोरदार पाऊस झाला. दुपारी तीन वाजेनंतर शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढग दाटून आल्याने जणू अंधार पडला होता. काही मिनिटांतच दमदार सरींचा वर्षाव सुरू झाल्याने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहिले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्याने सायंकाळी घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांचे हाल झाले.
मागील दोन दिवसांपासून शहराच्या वातावरणात उकाडा जाणवत आहे. बुधवारीही सकाळपासून दुपारपर्यंत उष्मा कायम होता. दुपारी ढगाळ हवामान तयार झाल्यानंतर थंड वारा सुटला अन सरींच्या वर्षावाला सुरूवात झाली. उपनगर, द्वारका, जुने नाशिक, पंचवटी, वडाळागाव, इंदिरानगर, पाथर्डी, सातपूर या उपनगरीय भागात जोरदार सरी कोसळल्या. देवळाली कॅम्प, भगूर परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला सुमारे दीड तास पावसाने या उपनगरांना झोडपले. शहराच्या सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, एमजीरोड, गंगापूररोड, शरणपूररोड, चांडक सर्कल, मुंबईनाका, कॉलेजरोड या मध्यवर्ती परिसरातदेखील जोरदार सरी सुमारे पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ कोसळल्या.
शहरांसह उपनगरीय भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून महापालिका प्रशासनाकडून डांबरीकरण करण्यात न आल्यामुळे पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचले होते. यामुळे नागरिकांना खड्डयांचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. बहुतांश वाहनचालकांना खड्डयांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राच्या परिसरात पाच वाजेपासून पावसाला सुरूवात झाली. अर्ध्यातासांत या भागात ६ मि.मी इतक्या पावसाची नोंद होऊ शकली. मंगळवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पेठरोड हवामान निरिक्षण केंद्राच्या परिसरात ९.५ मि.मीपर्यंत पाऊस मोजण्यात आला होता.
कमाल तापमान ३१अंशावर
दोन दिवसांपासून शहरात पुन्हा दररोज दुपारी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे कमाल तापमानाचा पारा घसरण्यास मदत होईल असे वाटत होते; मात्र बुधवारी कमाल तापमान ३१ अंश इतके नोंदविले गेले. मंगळवारी कमाल तापमानाचा पारा २४अंशापर्यंत खाली घसरला होता. अचानकपणे मध्यरात्रीपासून ढगाळा हवामान दाटून आल्याने पुन्हा उष्मा वाढण्यास सुरूवात झाली. बुधवारी सायंकाळपर्यंत ३१ अंशापर्यंत कमाल तापमान तर २२ अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद झाली.
खड्डयांमध्ये साचले पावसाचे पाणी
कॅनडा कॉर्नर ते आंद्रीया चर्च रस्ता, नाशिक-पुणे महामार्ग, त्रिमुर्ती-कामटवाडे रस्ता, आंबेडकर चौक-वडाळारोड, पंचवटी, जुना आडगावनाका, हिरावाडी, सातपूर-अंबड लिंकरोड, देवळाली कॅम्प लॅमरोड, द्वारका चौफू ली, अशोकामार्ग, वडाळागाव आदि भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झाली आहे. येथील खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहने खडडयांत जाऊन आदळताना पहवयास मिळाले. जोरदार पावसाने थातुरमातुर पध्दतीने बुजविण्यात आलेल्या खड्डयांमधील मुरूम-माती वाहून गेली असून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.