"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:52 IST2025-10-20T14:37:29+5:302025-10-20T14:52:47+5:30
नाशिक रोड येथे शनिवारी रेल्वे अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी झाला.

"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
Nashik Train Accident: दिवाळीच्या तोंडावर मुंबई-रक्सौल कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून दोन व्यक्तींच्या मृत्यूची घटना गर्दीमुळे घडली असल्याचा दावा मध्य रेल्वेने फेटाळून लावला आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे मृत्यू गर्दीमुळे नव्हे, तर दारूच्या नशेत रेल्वे रुळ ओलांडताना झाले आहेत. कर्मभूमी एक्सप्रेसमधून बिहार येथे जाणारे तीन प्रवासी ट्रेनमधून पडल्याची माहिती पुढे आल्यानंतर मध्य रेल्वेने या अपघाताच्या बाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेले हे दोघेजण हे प्रवासी नसून ते मजूर होते. तर तिसरा व्यक्ती गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल होता. दिवाळीसाठी गावी जाण्याकरता गाडीला झालेली प्रचंड गर्दी या अपघाताला कारणीभूत ठरली, असे दावे केले जात होते. मात्र, मध्य रेल्वेने हा अपघात रेल्वे रुळ ओलांडताना झाल्याचे समोर आलं आहे.
जखमी मजुराने दिली माहिती
या दुर्घटनेत जखमी झालेले जिमल श्यामजी यांच्याशी रेल्वे अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. श्यामजी हे उपचारादरम्यान शुद्धीवर आल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली. श्यामजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते तिघेही मूळचे गुजरातमधील दाहोद येथील रहिवासी असून, मालेगाव येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. तिघेही शिर्डीहून दर्शन घेऊन नाशिकला आले होते. नाशिकमध्ये आल्यावर तिघांनी मद्यपान केले होते.
Update of Nashik untowered incident
— Central Railway (@Central_Railway) October 19, 2025
The injured person Shri Jimal Shyamji who was hospitalised has regained consciousness and stated that they are labourers working at Malegaon.
They had come to Nashik after darshan at Shirdi.
They consumed alcohol at Nashik and then were…
दारूच्या नशेत रेल्वे रुळ ओलांडताना अपघात
मद्यपान केल्यानंतर ते तिघे रेल्वे रूळ ओलांडत असताना, अचानक दोन रेल्वे गाड्या विरुद्ध दिशेने आल्या. दोन्ही गाड्यांची या तिघांना जोरदार धडक बसली. यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर श्यामजी जखमी झाले.
मध्य रेल्वेने स्पष्टपणे सांगितले की, हे तिघेही कर्मभूमी एक्सप्रेसचे प्रवासी नव्हते. केवळ दारूच्या नशेत रुळ ओलांडत असताना हा अपघात घडला. जखमी जिमल श्यामजी यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे गर्दीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.