शहर १२६ : जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ९९९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 20:39 IST2020-05-26T20:38:06+5:302020-05-26T20:39:04+5:30
नाशिककरांनी आता लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेणे तत्काळ थांबवून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

शहर १२६ : जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ९९९ वर
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा मंगळवारी (दि.२६) ९९९ वर पोहचला आहे. तसेच नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी संध्याकाळी १२६ इतकी झाली. पाच दिवसांपुर्वी शहरात ४८ कोरोनाबाधित रूग्ण होते, यावरून शहरात कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेगाचा अंदाज सहज लावता येऊ शकतो. नाशिककरांनी आता लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेणे तत्काळ थांबवून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
शहरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदाराचा कोरोनाने मंगळवारी मृत्यू झाला. तसेच ठाणे येथील रहिवासी असलेला वाहनचालक हा कोरोनाग्रस्त रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल होता, त्याचाही मंगळवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. वडाळागावात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून येण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा एक नवा रूग्ण वडाळागावात मिळून आला. वडाळागावाचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १० झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार १० रुग्णांची भर पडली. दिंडोरी रोड-२, सिडको-१, पखालरोड-१, वडाळा-१, अमृतधाम परिसर-१, टाकळीरोड-१, क्रांतीनगर-१, हनुमाननगर-१, नाशिकरोड पाट रस्ता-१ याप्रमाणे दहा रुग्ण आढळून आाले आहे.
शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. यामध्ये गावठाण भागात आता कोरोनाचा शिरकाव अधिक चिंताजनक ठरणारा आहे. जुने नाशिक, शिवाजीवाडी झोपडपट्टी, क्रांतीनगर, रामनगर-पेठरोड, वडाळागाव या भागात होणारा फैलाव धोक्याची घंटा आहे. वडाळागावातील सादिकनगर, मुमताजनगर, आलिशान सोसा. हा परिसरर कन्टेंन्मेट झोन आहे.
शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे. मनपा आरोग्यप्रशासनापुढे कोरोनाचे संक्रमण झोपडपट्टयांमध्ये तसेच गावठाण भागात रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासाठी प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची मोठी गरज आहे. सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे.
नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखून घराबाहेर पडावे, तत्काळ काम आटोपून पुन्हा घरात जावे, लहान मुले, वृध्द व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरातदेखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावीत अशा विविध सुचना ध्वनीक्षेपकावरून संपुर्ण परिसरात दिल्या जात होत्या.