ढगाळ हवामानाचा कांद्याला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:29 IST2019-12-13T18:28:53+5:302019-12-13T18:29:16+5:30
ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. मात्र ढगाळ हवामानामुळे दिवसाआड फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.

ढगाळ हवामानाचा कांद्याला फटका
राजापूर : ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. मात्र ढगाळ हवामानामुळे दिवसाआड फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
ढगाळ हवामानाचा कांदा पिकासह इतर रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे. कांदा शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाते; पण ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या बुडाला खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कांदा जगविण्यासाठी महागडी कीटकनाशक, बुरशीनाशक व पोषक औषधांसाठी चार ते पाच हजार रु पयांचा खर्च वाढला आहे. सद्य:स्थितीत मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी खर्चही करीत आहेत. जर दर कोसले तर कर्जाच्या खाईत जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कांदा लागवडीपासून आतापर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. त्यात बदलत्या हवामानामुळे औषध व रासायनिक खताचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.