काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:50 IST2025-06-04T13:48:27+5:302025-06-04T13:50:02+5:30
Nashik Sudhakar Badgujar News: नाशिक येथे ठाकरे गटात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. काल उद्धवसेनेत नाराजी असल्याची कबुली देताच आज संजय राऊतांच्या फोननंतर सुधाकर बडगुजर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी
Nashik Sudhakar Badgujar News: नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी संघटनात्मक बदलावरून पक्षात नाराजी असल्याचे जाहीरपणे कबूल केले होते. नाशिकमधील १० ते १२ जण उद्धवसेनेत नाराज असल्याचेही बडगुजर म्हणाले होते. परंतु, यानंतर आता सुधाकर बडगुजर यांची थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊतांनी एक फोन केला आणि सुधाकर बडगुजर यांना काढून टाकण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या काही नेते, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची याच पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते.
सुधाकर बडगुजर संभ्रमात आहेत
सुधाकर बडगुजर संभ्रमात आहेत. गिरीश महाजन बडबडले, शिवसेना राहणार नाही. शिवसेनेमुळे भाजप वाढली. तुम्हाला पालकमंत्री देता येत नाही आणि तुम्ही पक्ष संपवायला निघाले. ही शिवसेना कधीच संपणार नाही, सर्व कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. नाशिकमध्ये शिबिर झाले, त्यानंतर कसली नाराजी? अशी विचारणा यावेळी सूर्यवंशी यांनी केली. तसेच विलास शिंदे हे घरच्या विवाह सोहळ्यामुळे गेले काही महिने अत्यंत व्यस्त होते. आता ते पत्रकार परिषदेलाही हजर आहेत. परंतु, फोन करूनही बडगुजर आले नाहीत, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊतांचा फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांना पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराजी आहे. आता मी स्पष्ट बोलू शकत नाही. संघटनात्मक बदल झाले तेव्हापासूनच नाराजी पसरली आहे. संघटनात्मक बदल झाल्यानंतर नाराजीनाट्य चालू झालेले आहे. संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचे वातावरण तयार झाले. त्यामुळेच अनेक जण नाराज झालेले आहेत. संघटनात्मक बदल मध्यंतरीच्या काळात झाले, तेव्हापासून महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा नेते नाराज आहेत. वरिष्ठांपर्यंत त्या भावना गेलेल्या आहेत. स्थानिक नेत्यांना याबाबत माहिती आहे. राजाभाऊ जेव्हा खासदार झाले, तेव्हा मी असेन किंवा विलास शिंदे असेल, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजय खेचून आणला. संघटनात्मक बाजू मजबूत होती, म्हणून तो विजय मिळवता आला, या शब्दांत सुधाकर बडगुजर यांनी आपली खंत बोलून दाखवली होती. परंतु, आता लगेचच दुसऱ्या दिवशी सुधाकर बडगुजर यांची संजय राऊतांच्या एका फोनवर हकालपट्टी करण्यात आली.