नाशिक जिल्ह्यात ४१२ पाणी पुरवठा योजना रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:20 IST2018-08-27T17:15:19+5:302018-08-27T17:20:18+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील ३ वर्षापासून अधिक कालावधी उलटूनही विविध कारणांमुळे ४१२ पाणी पुरवठा योजना रखडलेल्या आहेत. या योजनांचा आढावा घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले असून यासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी जबाबदार असलेल्या सर्व संबधितांना बोलावण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात ४१२ पाणी पुरवठा योजना रखडल्या
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील ३ वर्षापासून अधिक कालावधी उलटूनही विविध कारणांमुळे ४१२ पाणी पुरवठा योजना रखडलेल्या आहेत. या योजनांचा आढावा घेण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले असून यासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी जबाबदार असलेल्या सर्व संबधितांना बोलावण्यात आले आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांचे काम करण्यात येत आहे. मात्र विविध कारणांमुळे जिल्ह्यातील ४१२ योजना ३ वर्षापेक्षा अधिका कालावधीपासून रखडल्या असून त्यांचे अंतिमीकरण झालेले नाही. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करता येत नाही. गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येते मात्र समितीमधील अंतर्गत वाद, हागणदारीमुक्त गावाची अट, ठेकेदाराने केलेले अपूर्ण बांधकाम आदि कारणांमुळे पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहत आहेत. कोट्यावधीचा निधी देवूनही योजना रखडत असल्याने याबाबत सर्व संबधितांचा आढावा घेवून अपूर्ण कामाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून रखडलेली योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती डॉ नरेश गिते यांनी दिली.या आढावा बैठकीसाठी गट विकास अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सचिव, योजनेसाठी नेमलेले मक्तेदार, तांत्रिक सल्लागार यांना बोलावण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनी दिली.