लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : खरवड ते वैजाली रस्ता काही ठिकाणी वाहून गेला आहे तर काही ठिकाणी रस्त्यावरच चक्क काटेरी झुडपे उगवले आहेत. रस्त्यादरम्यान असलेले फरशी पूलही तुटले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणे म्हणजे जिकीरीचे झाले असून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी खरवड, वैजाली, करणखेडा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २००९-१० मध्ये या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम झाले होते. या रस्त्यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांची सोय झाली होती. मात्र सद्यस्थितीत रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी तर रस्त्याचे अस्तित्वच दिसत नाही. खरवड, वैजाली, करणखेडा आदी गावांमधील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. मात्र शेतात शेती औजारे, खते नेण्यासाठी व शेतातून शेतमाल वाहतुकीसाठी हा रस्ता अयोग्य झाला आहे. शेतकऱ्यांना कसरत करीत आपली वाहने चालवावी लागतात.करणखेडा -वैजाली रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. या रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या पूलापासून मार्ग नसल्याने नदीतून उतरुन जावे लागते. काही वाहनधारक हा रस्ता शॉर्टकट असल्याने येथून ये-जा करतात. पुढे गेल्यावर वैजालीनजीक एका नदीवर पुलाचे बांधकामही झाले आहे. वैजालीला पोहोचण्यासाठी या रस्त्याने दीड किलोमीटर अंतर आहे. मात्र रस्त्याच्या दुर्दशमुळे नांदर्डेमार्गे पाच किलोमीटरचा फेरा मारुन वाहनधारकांना जावे लागते. वैजाली गावाजवळील पूल संपल्यानंतर रस्ता नसल्याने याठिकाणी रस्ता तयार करण्याची गरज आहे. कलमाडी रस्त्याला हा रस्ता जोडल्यास ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे.रस्ता नसताना फरशीची दुरुस्ती का?करणखेडा ते वैजाली मार्गावर खड्डे, काटेरी झुडपे तर काही ठिकाणी रस्त्याच वाहून गेला आहे. ही कामे महत्त्वाची असताना लाखो रुपये खर्च करून येथे फरशीचे बांधकाम का झाले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुरामुळे फरशी पुलाचा भरावही वाहून गेला आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
वैजाली-करणखेडा रस्त्याची लागली ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 1:32 PM