वर्गणीतून स्थापीत वस्तीला संरक्षण भिंतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:18 PM2020-02-27T13:18:31+5:302020-02-27T13:20:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : प्रतिकुल परिस्थितीमुळे दळणवळण व अन्य सुविधा पोहोचू शकत नसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ व माळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमावल : प्रतिकुल परिस्थितीमुळे दळणवळण व अन्य सुविधा पोहोचू शकत नसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ व माळ येथील काही नागरिकांनी स्थलांतर केले. वर्गणी करीत घेतलेल्या जमिनीवर त्यांनी ‘रामगड’ ही नवीन वसाहतही स्थापन केली, परंतु या गावातून वाहणाऱ्या ‘बेनू हेजाहा’ या नदीमुळे वसाहतीच्या जागेला पोखरले. नदीपात्र विस्तारत असल्याने पुराचे पाणी थेट वसाहतीत शिरत आहे. त्यामुळे तेथे संरक्षण भिंतीची नितांत गरज आहे.
केंद्र सातपुड्याच्या दुर्गम भागात विरळ लोकवस्ती असलेल्या खुर्चीमाळ व माळ येथे माळमाथा शिवाय उंचसखोल भागामुळे दळणवळण व अन्य सुविधा झाल्या नाही. सुविधांचा आभाव, पोटखराब शेती, आरोग्याच्या समस्या, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, शिक्षणाची समस्या, रोजगाराचा प्रश्न पाचवीला पुजलेला, उपासमारी यामुळे तेथी आदिवासी बांधवांना उपजीविका करणे कठिण झाले आहे. परिणामी ते स्थलांतरही करीत आहे.
उमरागव्हाण ता. अक्कलकुवा या ग्रुप ग्रामपंचायतीत येणारे खुर्चीमाळ व माळ येथील ज्येष्ठांनी भोगलेले दिवस मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून तेथील काही नागरिकांनी स्थलांतराचा मार्ग अवलंबला. त्यात त्यांनी सातपुडा पायथ्यालगत असलेल्या मौजे मौलीपाडा शिवारात जमीन वर्गणी करून विकत घेतली अन् तेथेच रामगड नावाची नवीन वसाहत स्थापन केली. रामगड हे आलीविहिर व मौलीपाडा या दोन गावांदरम्यान असून ते बºहाणपूर - अंकलेश्वर महामार्गावरील शिर्वे गावाच्या उत्तरेस सात किलो मिटर अंतरावर आहे. या नव्या वसाहतीत नऊ घरे असून त्याच्या लोकसंख्या १०० आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी दळणवळण सुविधेच्या दृष्टीने सोयीच्या रामगड गावातून ‘बेनू हेजाहा’ ही नदी वाहते. पावसाळ्यात वेगाने वाहणाºया प्रवाहात जमिनीची क्षती झाली. त्यामुळे ‘बेनू हेजाहा’ या नदीच्या पुराचे पाणी थेट गावात शिरत आहे. मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उचळी घेत वाहणाºया प्रवाहामुळे ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली. त्यामुळे त्यांना शेजारील गावात आसरा घ्यावा लागला. काही घरांची पडझड होऊन अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. नदी पात्राच्या विस्तारामुळे गावाची जागा अपुरी पडू लागली, त्यामुळे तेथे संरक्षण भिंतीची नितांत आवश्यकता भासत आहे. हे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी तेथील नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी दोन हातपंप स्वखर्चाने बसवले. त्यामुळे घरगुती व गुरांसाठी पाण्याची सोय झाली.
अन्य समस्यांप्रमाणेच तेथे मुलांना शिक्षणाच्या सुविधा नसल्यामुळे तेथील काही पालक मुलांना शिक्षणासाठी शेजारील गावांमध्ये पाठवत आहे.
आरोग्य, रोजगार व उपासमारीसह अनेक गंभीर समस्याला सामोरे जात येथील नागरिक आपले जीवन जगत आहे. वयस्कांनी पाल्याचे जीवनमान उंचवावे, भेडसावणाऱ्या अनेक समस्या सुटाव्या म्हणून दुर्गम भागातून आपल्या पाल्यासह स्थलांतर केले. या स्थलांतराने भोगोलिक परिस्थिती बदलली असली तरी समस्या मात्र कायम आहे.
नवीन वसाहत स्थापन करणारे ग्रामस्थ वनपट्टे कसत असून हे वनपट्टे रामगड या नव्या वसाहतीपासून जवळच आहे. यामुळे सोयीचे ठिकाण निवडत त्यांनी तेथे वसाहत स्थापन केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु तेथेही काही समस्या निर्माण झाल्याने हे सुविधा देण्याची मागणी करीत आहे.