पुतण्याने काकाचा, भावजयीने नणंद आणि भावाने केला भावाचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:57 PM2021-01-20T12:57:08+5:302021-01-20T12:57:17+5:30
भूषण रामराजे लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १९ व्या शतकाच्या प्रारंभी तालुक्याच्या पूर्व दिशेला छोटेखानी वस्तीत दोन भाऊ बाहेरगावाहून ...
भूषण रामराजे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : १९ व्या शतकाच्या प्रारंभी तालुक्याच्या पूर्व दिशेला छोटेखानी वस्तीत दोन भाऊ बाहेरगावाहून आले. त्यांनी याठिकाणी बस्तान बसवलं आणि मग त्यांच्या पिढ्या या ठिकाणी जन्माला आल्या. यातून गावातील निम्मी लोकसंख्या एकमेकांचे सख्खे अथवा चुलत भाऊबंद झाले. अशा या भाऊबंदकीच्या गावाचे नाव म्हणजे कंढ्रे होय. या गावची निवडणूक यंदा चर्चेचा विषय होती. यात भावजयीने नणंदेचा तर पुतण्याने काकाचा पराभव केल्याने चर्चा आणखी रंगल्या आहेत.
तीन प्रभाग, सात सदस्य आणि ८०६ मतदारांचा समावेश असलेलं आटोपशीर गाव म्हणून कंढ्रे गावाची ओळख आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या गावात पाटील कुटूंबाच्या एखाद्या घरात एखादी व्यक्तीत मृत झाल्यास अर्ध गाव सूतकात जातं. १९५६ साली येथील ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. २००५ पर्यंत याठिकाणी निवडणूक म्हणजे बिनविरोध असाच अनुभव होता. परंतू २००५ पासून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरु होवून मतदान पार पडू लागलं. गावात राजकीय पक्षांना मानणारे दोन गट पडले तेही एकाच कुटूंबातले अन् याच कुटूंबांमधून ग्रामपंचायत निवडणूकीचा राजकीय धुराळा उडू लागला.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सत्तेत असलेलं प्रगती आणि विरोधात परिवर्तन अशा दोन पॅनलच्या चाैदा उमेदवारांमध्ये सरळ लढती झाल्या. यात प्रभाग एकमध्ये संगिता लोटन पाटील ह्या परिवर्तन पॅनलच्या सदस्य आहेत तर त्यांच्याविरोधात सुमनबाई शिवाजी पाटील ह्या होत्या. संगिता ह्या पॅनलप्रमुख मुकेश विश्वास पाटील यांच्या काकू व माजी सरपंच आहेत. त्यांनी सुमनबाई यांचा पराभव केला. या दोघींमध्ये दीराणी-जेठाणीचं नातं आहे.
प्रभाग दोनमध्ये अंकुश अवचीत पाटील व नागेश देविदास पाटील हे दोघे सख्खे चुलत भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे होते. यात अंकुश पाटील यांनी विजय मिळवला आहे. याच प्रभागात सर्वसाधारण स्त्री गटातून पूनम रतीलाल पाटील व विद्या पंकज पाटील ह्या समोरासमोर आहेत. पूनम व विद्यांच नणंद भावजयीचं नातं आहे. विद्या ह्या माजी सरपंच सुनंदाबाई पाटील यांच्या स्नुषा आहेत. या निवडणूकीत मात्र विद्या यांनी बाजी मारत नणंद असलेल्या पूनम यांना पराभूत केले आहे.
माजी सरपंच बेबीबाई सुरेश पाटील ह्या पुष्पाबाई रमेश पाटील यांच्याविरोधात आहेत. या दोघींमध्ये जावांचं नातं आहे. निवडणूकीत पुष्पाबाई यांचा विजय झाला आहे. याच प्रभागातील पंकज हरचंद पाटील व रामकृष्ण अशोक पाटील हे काका-पुतणे एकमेकांविरोधात होते. यात रामकृष्ण या २१ वर्षीय पुतण्याने बाजी मारली असून त्याने कमी वयात सदस्य होण्याचा मान मिळवला आहे.
या निवडणूकीत पराभूत झालेली पूनम ही अवघ्या २१ वर्षांची आहे. आपण आपल्याच नातलंगांच्या विरोधात लढतो आहोत ज्ञात होतं. परंतू ही लढत म्हणजे गावातील अस्तित्त्व असल्याचे सांगत ते निवडणूक रिंगणात होते. पाटील कुटूंबातील भाऊबंदकी रिंगणात असताना प्रभाग एकमध्ये आदिवासी संवर्गातून लढणा-या मथुराबाई भिल ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण भिल यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचे जवळचे नातलग असलेल्या मनिषा भिल ह्या लढत होत्या. चुरशीच्या लढतीत मनिषा भिल ह्या विजयी झाल्या तर दुसरीकडे माजी उपसरपंच नाना सोमा भिल यांच्या विरोधात त्यांचे आतेभाऊ शरद गुलाब भिल होते. आतेभाऊ शरद भिल यांनी माजी उपसरपंच नाना भिल यांचा सहज पराभव केला आहे.
निवडून आलेले परिवर्तन पॅनल गावात खरंच परिवर्तन घडवून आणणार कि मग पाच वर्षानंतर पुन्हा निवडणूकीत येणार याकडे मात्र लक्ष लागून राहिल.
शिक्षित युवकाने घडवले परिवर्तन दरम्यान गावात गेल्या पाच वर्षात विकास झालेला नसल्याने ग्रामस्थांना परिवर्तन हवे होत असे पॅनलप्रमुख मुकेश विश्वास पाटील यांनी सांगितले. मुकेश पाटील हे उच्चशिक्षित आहेत. परंतू गावात सेवा करावी यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांच्या काकू ह्या निवडणूकीत विजयी झाल्या आहेत. त्यांना संपर्क केला असता गावांमध्ये समस्या खूप आहेत. निवडून गेलेले पदाधिकारी हे मतदारांना गृहित धरतात. परंतू मतदार हा सर्वात सजग असा घटक आहे. त्याने ठरवल्यास सत्तांतर होतेच. फक्त त्याला योग्य ती भूमिका पटवून देण्याची गरज आहे.