जिल्ह्यात ४२ हजार क्विंटल धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 12:51 PM2020-04-10T12:51:54+5:302020-04-10T12:52:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील एक लाख ६० हजार ९०६ कार्डधारकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील एक लाख ६० हजार ९०६ कार्डधारकांना सुमारे ४२ हजार २१४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकूण दोन लाख ६१ हजार ९३९ रेशनकार्डधारक असून लाभार्थ्यांना एक हजार ६१ स्वस्त धान्य दुकानाद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ देण्यात येतो. कोविड-१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असल्याने अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला केंद्र सरकारतर्फे ५ किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तिन्ही महिन्याचे नियमित धान्य त्या-त्या महिन्याला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार २३२ क्विंटल गहू, २४ हजार ९८२ क्विंटल आणि ६०० क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या १,७३१ कार्डधारकांनी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी योजनेअंतर्गत आॅनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळाचे १२ एप्रिलपासून वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत धान्य वाटपाला गती देण्यात आली असून स्वत: जिल्हाधिकारी डॉ.भारुड आणि जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार धान्यवाटपाचा दैनंदीन आढावा घेत आहेत. शेलार यांनी आज अचानक खांडबारा येथे रेशन दुकान व गोदामाला भेट दिली.
अन्नधान्य वितरण नियमानुसार व्हावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानकपणे धान्य वितरणाच्या ठिकाणी भेट देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी तक्रार असल्यास जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवहान जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.