लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने हातकामावर जगणाऱ्या मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शेती कामे सुरू झाल्याने ग्रामीण भागातील काही शेतमजुरांना शेणखत भरणे, बाजरी पिकाची कापणी व मळणी करणे, पपई लागवड करणे तसेच पिकांना क्रॉप कव्हर लावण्यात येत असल्याने त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून गेल्या दीड ते दोन महिन्यापासून शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे हातमजुरी, शेतमजुरी करणारे दिवसा काम करून रात्रीची चूल पेटणार या मजुरांवर मोठे संकट ओढावले आहे. हाताला काम मिळत नसल्याने त्यांना दोन वेळचे अन्न शिजवणेदेखील कठीण झाले होते. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी थोडे दिवस संसाराचे गाडे चालेल एवढी मदत केल्यामुळे त्यांना थोडा धीर भेटला. मात्र आता बळीराजा रब्बी नंतर पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यामुळे शेती मशागतीसह सिंचन व्यवस्थेवर ठिंबक पद्धतीने पपई, केळीची लागवडीची कामे सुरू झाली आहेत.तालुक्यात शेतकरी वर्गाकडून पपई, केळी पिकाची लागवड करण्याचे काम सुरू आहे. रोपांची लागवड केल्यानंतर त्यांची जोराचे वारे, उन्हापासून तसेच कीटक, ससा यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कॉटन स्कार्फ लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे काही मजुरांना रोजगार निर्माण होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.
शेती कामांमुळे मिळतोय मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:00 PM