स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने कृषी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:51+5:302021-02-05T08:07:51+5:30
दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या वतीने दरवर्षी नाशिक येथील डोंगरी वसतिगृह मैदानात जागतिक दर्जाचे ...

स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने कृषी मेळावा
दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या वतीने दरवर्षी नाशिक येथील डोंगरी वसतिगृह मैदानात जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन जानेवारी महिन्यात आयोजित केले जाते. परंतु सध्याची कोविड-१९ महामारी पाहता श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाचे प्रणेते आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशान्वये नाशिक येथील कृषी मेळावा रद्द करून तालुका व गावपातळीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व बोरद, ता. तळोदा येथील जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक दोन येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
बोरद येथील कृषी मेळाव्याचे उद्घाटन सरपंच वासंतीबाई ठाकरे, प्रगतिशील शेतकरी मिलिंद पाटील, पंचायत समिती सदस्य विजयसिंह राजपूत, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, प्रगतिशील शेतकरी सोमनाथ चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.
या कृषी मेळाव्यामध्ये कृषी विषयक बॅनरच्या स्वरूपात मांडणी करून प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात शेतीला आवश्यक असणारी माहिती व तंत्र बॅनरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नंतर १८ विभागांची माहिती देण्यात आली. यात याज्ञिकी विभाग, मराठी अस्मिता, प्रश्नोत्तर विभाग, विवाह संस्कार, याज्ञिकी, बालसंस्कार, माहिती व तंत्रज्ञान, पर्यावरण प्रकृती विभाग, पशू व गोवंश, गर्भसंस्कार, जनकल्याण व स्वयंरोजगार इत्यादी प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामस्थ व सेवेकऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी महिलांची ओढ मराठी अस्मितेतील १५ स्टॉलकडे जाणवली. त्यातून त्यांनी परंपरागत सण व उत्सव कसे साजरे करावे या संदर्भातील माहिती जाणून घेतली. मेळाव्यासाठी केंद्रातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
वातावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला जैविक शेती आता ही काळाची गरज बनली आहे. निसर्ग चुकला आहे असे बोलले जाते मात्र निसर्ग चुकलेला नाही तर मानव चुकलेला आहे. मानवाने निसर्गावर अन्याय करावा आणि मग आपण त्या निसर्गाकडून परतफेडीची अपेक्षा करावी हे योग्य नाही, असे मत तळोदा पंचायत समिती सदस्य विजयसिंग राजपूत यांनी बोरद येथे पार पडलेल्या कृषी मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले.