अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:28+5:302020-12-30T04:23:28+5:30
किनवट : जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टी, परतीचा पाऊस व सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित ...

अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार
किनवट : जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टी, परतीचा पाऊस व सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना दिवाळीला दिले जाणारी मदत तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या किनवट किनवट शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या १७ गावांना होळी शिमग्यालाही मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. नुकसानीची मदत मिळवण्यासाठी इंग्रजी किंवा मराठी आद्यअक्षरापासून अ पासून सुरू होणाऱ्या पाच गावांना पाच महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजे मे व जून महिन्यात अनुदान मिळेल असे लावण्यात आलेल्या वेळापत्रकात दिसून येत आहे.
जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टी, परतीच्या पावसाने व सततच्या पावसाने खरीप हंगामातील शेती पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान रक्कम जाहीर झाली. त्याचा पन्नास टक्के निधीची रक्कम नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यावर जमा झाला. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किनवट शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या पन्नास गावाच्या १५ हजार ४७९ शेतकऱ्यांचे ६ कोटी ४८ लाख ५४ हजार रुपये जमा झाले. २३ नोव्हेंबर पासून मराठी किंवा इंग्रजी अध्यक्षरापासून वाटप करण्याच्या सूचना तहसीलदार किनवट यांनी संबंधित बँकेला देऊनही बँकेने या आदेशाला बगल देऊन झेड अक्षरापासून वाटप सुरू केले आहे. आजपर्यंत केवळ नऊ गावच्या बाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. आजही ४१ गावचे शेतकरी अनऊदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात व्हावी म्हणून दिवाळीच्या काळात अनुदान बँकेच्या खात्यावर जमा होऊनही याद्यांचा घोळ असल्याने विलंबाने वाटप सुरू झाले दिवाळी गेली १७ गावच्या ५ हजार ५२६ शेतकऱ्यांना २ कोटी १८ लाख १९ हजार रुपयांचे होळी, शिमग्यालाही वाटप होणार नसल्याचे दिसून येत आहे. तर अंबाडी, अंबाडीतांडा, आंदबोरी, आमडी, आंजी या पाच गावच्या १ हजार ७१३ शेतकऱ्यांना ७४ लाख २० हजार रुपये आतापासूनच पाच महिन्यानंतर मिळणार आहे. पाच पाच महिने अनुदान वाटपाला लागत असेल तर अनुदान जाहीर करून उपयोग काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
नुकसानभरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या याद्यासह नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे १३ नोव्हेंबर २०२० रोजी वर्ग केले मात्र वाटप होण्याचा पत्ताच नाही. अजूनही प्रतिक्षाच करावी लागत आहे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना लागत असलेला विलंब पहाता अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या किनवट शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.