किनवटमध्ये मातीच्या ढिगाऱ्यावर भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:36 IST2019-06-18T00:33:50+5:302019-06-18T00:36:31+5:30
निजामकालीन जिल्हा परिषद मुलींची हायस्कूल व उर्दू शाळा नगर परिषदेने पर्यायी व्यवस्था न करता पाडून मराठी व उर्दू माध्यमाच्या ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा प्रकार किनवटमध्ये घडला.

किनवटमध्ये मातीच्या ढिगाऱ्यावर भरली शाळा
किनवट : निजामकालीन जिल्हा परिषद मुलींची हायस्कूल व उर्दू शाळा नगर परिषदेने पर्यायी व्यवस्था न करता पाडून मराठी व उर्दू माध्यमाच्या ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा प्रकार किनवटमध्ये घडला. पालिकेने नेस्तनाबूत केलेल्या जुन्या इमारतीच्या ढिगा-यावर पहिल्याच दिवशी शाळा भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली.
किनवटच्या मध्यवर्ती भागात निजामकालीन जिल्हा परिषदेची माध्यमिक कन्या शाळा व उर्दू शाळा होती. उर्दू माध्यमांचे पहिली ते चौथी चे २६ तर मराठी माध्यमाचे पहिली ते सातवीचे ४९ असे ७५ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. यापूर्वी नगर परिषद किनवटने उर्दू व मराठी माध्यमाच्या दोन इमारती पाडून त्या इमारतीच्या समोरच्या भागात नगर परिषद किनवटची नवीन इमारत बांधण्यात आली. ३ जून रोजी दस्तऐवज व शैक्षणिक साहित्य न हलवता इमारत पाडण्यात आली.
या दरम्यान, संबंधितांनी विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे १७ जून रोजी शैक्षणिक सत्राला आरंभ होताच विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली.
शाळेची इमारत पाडलेली असल्याने आता जावे कुठे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. शेवटी शाळेच्या ढिगाºयावर वर्ग भरविण्यात आले तर नगरपालिका नव्या इमारतीच्या पाय-यावर राष्ट्रगीत व प्रार्थना विद्यार्थ्यांनी घेतली.
वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत शाळा तेथेच भरेल
शाळेची इमारत पाडण्यात आल्याने शालेय अभिलेखे, कपाट, रापटर, अन्य साहित्य असे १ कोटी ३५ लाखांचे नुकसान झाले. तसे पत्र पालिका मुख्याधिकारी यांना दिले आहे. उलट आम्हालाच पालिकेने एक पत्र दिले. इमारत आमची जागा आमची. याला तुम्ही जबाबदार आहात असे त्यात नमूद करण्यात आले. सदर पत्र शिक्षणाधिकारी यांना पाठवून शाळा स्थलांतराची परवानगी द्यावी, असे नमूद केले आहे. पालिकेने कोणती पर्यायी व्यवस्था केली, ती जागा दाखविण्यात आली नाही. वरिष्ठांचे आदेश जोपर्यंत येणार नाहीत, तोपर्यंत शाळा तेथेचे भरेल. मला शाळा हलविण्याचा अधिकार नाही. - सुभाष पवणे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. किनवट
पर्यायी व्यवस्था केलेल्या शाळेत एक दिवस सोडू. वारंवार कसे सोडणार? जेथे शाळा होती, तेथेच शाळा भरवावी -सय्यद अकबर,पालक
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मध्यवर्ती भागात तत्काळ सुविधा उपलब्ध करुन द्यावी. अरुणकुमार वतनीवकील, निवृत्त गटशिक्षणाधिकारी, किनवट