नांदेड हादरलं! रेड्यांच्या टकरीने घेतला १० वीतल्या मुलाचा जीव; शर्यतीच्या उत्साहाचा करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 11:58 IST2026-02-16T11:57:54+5:302026-02-16T11:58:48+5:30
शर्यतीचा थरार जिवावर बेतला; कंधार तालुक्यातील आलेगावची हृदयद्रावक घटना

नांदेड हादरलं! रेड्यांच्या टकरीने घेतला १० वीतल्या मुलाचा जीव; शर्यतीच्या उत्साहाचा करुण अंत
बारुळ (जि. नांदेड): नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आलेगाव येथे रेड्यांच्या टकरीचा खेळ पाहणे एका १७ वर्षीय मुलाच्या जिवावर बेतले आहे. रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या बेकायदेशीर शर्यतीत रेड्याने दिलेल्या भीषण धडकेत खंडू रामचंद्र झंपलवाड या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खंडू हा यंदा दहावीची परीक्षा देणार होता, मात्र परीक्षेपूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली.
कष्टाची भाकरी आणि परीक्षेची तयारी
खंडूचे कुटुंब ऊसतोड कामगार आहे. आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी तो शेतात ऊसतोडणीच्या कामात हातभार लावत असे. कष्टाची कामे करून तो दहावीच्या परीक्षेची तयारीही करत होता. रविवारी आलेगाव येथे रेड्यांच्या टकरीची शर्यत बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शेवटची टक्कर सुरू असताना एक रेडा अचानक अनियंत्रित झाला आणि त्याने प्रेक्षकांमध्ये उभ्या असलेल्या खंडूला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, खंडूचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसात तक्रार नाही?
या घटनेमुळे बाचोटी आणि आलेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस पाटील बालाजी डुबुकवाड यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मात्र, उस्माननगर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. एका बाजूला खेळाचा उत्साह आणि दुसऱ्या बाजूला एका गरीब घराचा आधार गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.