'नांदेड महामार्ग मृत्यूचा सापळाच!' आठवड्याभरात तीन मृत्यूंनी दाभड ग्रामस्थांचा संताप, चक्काजाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:31 IST2026-02-11T12:29:48+5:302026-02-11T12:31:02+5:30
दाभडमध्ये मृत्यूचे थैमान! अपघातांच्या मालिकेमुळे ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक; भुयारी मार्गासाठी महामार्गावर तीव्र 'चक्का जाम'

'नांदेड महामार्ग मृत्यूचा सापळाच!' आठवड्याभरात तीन मृत्यूंनी दाभड ग्रामस्थांचा संताप, चक्काजाम
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड):नांदेड-निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील दाभड पाटीजवळ गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मृत्यूच्या सत्रामुळे दाभडसह परिसरातील चार गावांचा संयम अखेर सुटला आहे. सलग तीन महिलांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी महामार्गावर तीव्र 'चक्का जाम' आंदोलन केले. सुमारे ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने महामार्गावर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
१० दिवसांतील 'तो' काळजाला घरं पाडणारा घटनाक्रम
दाभड परिसरात सध्या भयाण शांतता आणि भीतीचे वातावरण आहे. १० फेब्रुवारी रोजी अनुसयाबाई जाधव यांचा कार अपघातात मृत्यू झाला, तर त्यापूर्वी २७ जानेवारीला कलावतीबाई तारडे यांचे निधन झाले होते. २८ जानेवारीला पार्वतीबाई सूर्यवंशी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली. या लागोपाठच्या हृदयद्रावक घटनांमुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी रस्ता रोखला. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.
प्रशासनाची धावपळ अन् भुयारी मार्गाची ग्वाही
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता महामार्ग प्रकल्प संचालक महेश पाटील आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. "आमच्या घराबाहेर मृत्यू टपून बसला आहे, आम्हाला तातडीने भुयारी मार्ग हवा," अशी मागणी १५ हजार लोकसंख्येच्या या चार गावांनी लावून धरली. अखेर, दाभड पाटीजवळ भुयारी मार्गाला तांत्रिक मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे लेखी आश्वासन प्रकल्प संचालकांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, "जर कामाला सुरुवात झाली नाही, तर यापुढील आंदोलन अधिक उग्र असेल," असा इशाराही दाभडकरांनी दिला आहे.