मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी 'मिसिंग रेल्वे लिंक' पूर्ण करा!: अशोक चव्हाणांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 20:00 IST2026-03-10T19:59:51+5:302026-03-10T20:00:07+5:30
६ तासांचा रेल्वे प्रवास सव्वा तासावर येणार! १०४ किमीच्या नवीन मार्गासाठी खासदार अशोक चव्हाण राज्यसभेत आक्रमक

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी 'मिसिंग रेल्वे लिंक' पूर्ण करा!: अशोक चव्हाणांची मागणी
नांदेड : नांदेड-लातूर थेट रेल्वेमार्गाचा प्रस्ताव केवळ दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प नसून ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना रेल्वेमार्गे जवळच्या अंतराने जोडणारी एक महत्त्वाची 'मिसिंग लिंक' असल्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देण्याची मागणी त्यांनी सोमवारी राज्यसभेत केली.
शून्य प्रहरात काळात हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, नांदेड आणि लातूर ही मराठवाड्यातील कृषी व व्यापाराची मोठी केंद्रे आहेत. मात्र, या दोन शहरांत अद्याप थेट रेल्वे मार्ग नाही. सध्या रेल्वेने २१२ किमीचा वळसा घालून जाण्यासाठी ६ तास लागतात, तर रस्ते मार्ग १४४ किमीचा आहे. प्रस्तावित १०४ किमीच्या नवीन थेट रेल्वे मार्गामुळे हा प्रवास अवघ्या सव्वा तासात पूर्ण होणे शक्य आहे.
तांत्रिक आकडेवारी सादर करीत चव्हाण म्हणाले, ही मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात मिरज या दोन मोठ्या रेल्वे जंक्शनमधील अंतर ९९१ किमीवरून ८०७ किमीवर येईल. म्हणजेच सुमारे १८४ किमीचे अंतर कमी होईल. याचा थेट फायदा विदर्भ आणि शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेशातील बिलासपूर व जबलपूरसारख्या शहरांना पश्चिम किनारपट्टीकडे जाण्यासाठी होईल.
महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या खर्चात आपला ५० टक्के वाटा उचलण्याचे अगोदरच मान्य केले आहे. या प्रकल्पाचा 'फायनल लोकेशन सर्व्हे' देखील पूर्ण झाला असून प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. केंद्र सरकारने याला तातडीने मंजुरी दिल्यास राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असे चव्हाण म्हणाले.