अर्धापूरात हायवेवर प्रशासनाचा 'बुलडोझर पॅटर्न'; नामांकित धाबे, हॉटेल्सचे अतिक्रमण जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:08 IST2026-03-24T19:03:47+5:302026-03-24T19:08:59+5:30
अर्धापूरमध्ये रस्ता गिळणाऱ्या भूमाफियांना चाप, पोलीस अधीक्षकांच्या अहवालानंतर मोठी कारवाई

अर्धापूरात हायवेवर प्रशासनाचा 'बुलडोझर पॅटर्न'; नामांकित धाबे, हॉटेल्सचे अतिक्रमण जमीनदोस्त
अर्धापूर (जि. नांदेड): नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभड येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा बळी गेल्यानंतर, सुस्त प्रशासनाला अखेर जाग आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानंतर, अर्धापूर हद्दीतील महामार्गावरील अतिक्रमणांवर मंगळवारी प्रशासनाचा 'बुलडोझर' चालला. या धडक मोहिमेत अनेक नामांकित धाबे, हॉटेल्स आणि अनधिकृत पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
सरकारी जागा भाड्याने देण्याचा 'प्रताप' उघड
या मोहिमेदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गाची सरकारी जागा काही स्थानिक 'मालकांनी' चक्क खासगी लोकांना भाडेतत्त्वावर दिली होती. या अवैध धंद्याला प्रशासनाने आता कायमचा चाप लावला आहे. अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी सादर केलेल्या वाढत्या अपघातांच्या सविस्तर अहवालाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी 'अंबाई धाबा' या नामांकित हॉटेलचे अतिक्रमण पाडताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
अर्धापूर हायवेवर 'बुलडोझर पॅटर्न'; दाभड अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा अॅक्शन मोड, अनधिकृत बांधकामे भुईसपाट #nanded#marathwada#accidentpic.twitter.com/rtlI7B8I8W
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 24, 2026
केवळ मलमपट्टी की कायमस्वरूपी तोडगा?
प्रशासनाने रस्ता मोकळा केला असला, तरी स्थानिक जनतेत अजूनही साशंकता आहे. दाभड फाट्यावर कायमस्वरूपी अंडरपास (भुयारी मार्ग) नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून हायवे ओलांडावा लागतो. जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तांत्रिक त्रुटी दूर करत नाही आणि वेग मर्यादेचे फलक लावत नाही, तोपर्यंत हा पट्टा 'डेथ ट्रॅप'च राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता दाखवलेला कणखरपणा सातत्याने टिकवून ठेवणे, हेच खरे आव्हान आहे.