'दादा म्हणाले मी निघतो अन् ते कायमचेच निघून गेले!', अजितदादांच्या निधनाने अशोक चव्हाण सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:19 IST2026-01-29T18:18:06+5:302026-01-29T18:19:29+5:30
Ajit Pawar Death: अवघ्या तीन दिवसांपूर्वी 'हिंद-दी-चादर' कार्यक्रमासाठी दादा नांदेडमध्ये आले होते. लंगरमध्ये एकत्र जेवण झाल्यानंतर विमानतळाकडे निघताना त्यांनी हसून हस्तांदोलन केले होते.

'दादा म्हणाले मी निघतो अन् ते कायमचेच निघून गेले!', अजितदादांच्या निधनाने अशोक चव्हाण सुन्न
नांदेड: "अजितदादा म्हणाले, 'मी पुढे निघतो', आणि आज ते खरोखरच आम्हाला सोडून कायमचे निघून गेले," अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच चव्हाण यांना धक्का बसला असून, अवघ्या तीन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये झालेली भेट ही शेवटची ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही मनात आली नव्हती, असे त्यांनी नमूद केले.
काळजाचा ठोका चुकवणारी 'ती' दृश्ये बुधवारी सकाळी संसदेत जाण्याची तयारी करत असताना अशोक चव्हाण यांनी टीव्ही सुरू केला. स्क्रीनवर विमानाचा भीषण अपघात आणि बेचिराख झालेल्या अवशेषांची दृश्ये पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अवघ्या तीन दिवसांपूर्वी 'हिंद-दी-चादर' कार्यक्रमासाठी दादा नांदेडमध्ये आले होते. लंगरमध्ये एकत्र जेवण झाल्यानंतर विमानतळाकडे निघताना त्यांनी हसून हस्तांदोलन केले होते. "ते आमचे शेवटचे हस्तांदोलन ठरेल, असे वाटले नव्हते," असे चव्हाण म्हणाले.
'देवगिरी'वरील शेवटचा पाहुणचार विधीमंडळातील अनेक वर्षांच्या सहवासाची आठवण सांगताना चव्हाण म्हणाले की, आमचे नाते मैत्रीचे आणि चेष्टेमस्करीचे होते. २९ ऑक्टोबरला अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण मुंबईतील 'देवगिरी' बंगल्यावर कामाच्या निमित्ताने गेले होते. तिथेही दादांनी तत्काळ अधिकाऱ्यांना फोन करून कामे मार्गी लावली. "काम झाल्यावर दादा स्वतः आम्हाला बंगल्याच्या दारापर्यंत सोडायला आले होते, त्यांचा तो साधेपणा आजही डोळ्यांसमोर आहे," अशी आठवण त्यांनी सांगितली. काटेकोरपणे वेळ पाळणाऱ्या अजितदादांना नियतीने अवेळी हिरावून घेणे हा एक क्रूर विनोद आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.