आदिलाबाद - माहूर -पोहरादेवी - वाशीम रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; काम सुरू कधी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:53 IST2026-03-18T15:53:13+5:302026-03-18T15:53:38+5:30
प्रकल्पाला ‘सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह’ असा दर्जाही देण्यात आला असून आता प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदिलाबाद - माहूर -पोहरादेवी - वाशीम रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; काम सुरू कधी होणार?
मांडवी (जि. नांदेड) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीक्षेत्र माहूर गड आणि बंजारा समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी (नंगार भवन) यांना जोडणाऱ्या आदिलाबाद -माहूर - पोहरादेवी -वाशीम या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद यांच्या वतीने १८५ किमी लांबीच्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी उचलण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रकल्पाला ‘सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह’ असा दर्जाही देण्यात आला असून आता प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. विशेषतः आदिवासी व बंजारा बहुल दुर्गम भागासाठी हा प्रकल्प विकासाचा नवा मार्ग ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मार्गामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. माहूर गड, पोहरादेवी, श्रीक्षेत्र उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे, हेमाडपंथी शिव मंदिर, ऋषी आश्रम, टिटवी वनक्षेत्र आणि कमळ तलाव यांसारखी स्थळे या रेल्वेमुळे अधिक सुलभ होणार आहेत. तसेच कापूस खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या आदिलाबाद बाजारपेठेशी थेट संपर्क वाढल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.
३ हजार ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी उचलण्याची तयारी दर्शविली असून हा प्रकल्प नांदेड रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येतो. मांडवी येथील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी रेल्वे सल्लागार सदस्य संजीवकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे महाप्रबंधकांची भेट घेतली आहे.
दरम्यान, नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.