तरुणाची निर्घृण हत्या
By Admin | Updated: May 18, 2016 03:08 IST2016-05-18T03:08:23+5:302016-05-18T03:08:23+5:30
सक्करदरा परिसरात मंगळवारी दिवसाढवळ्या अनिकेत विजयराव हिंगणीकर (वय २८, रा. संजय गांधीनगर) या तरुणाची निर्घृण हत्या झाली.

तरुणाची निर्घृण हत्या
सक्करदऱ्यात थरार : आरोपी गजाआड
नागपूर : सक्करदरा परिसरात मंगळवारी दिवसाढवळ्या अनिकेत विजयराव हिंगणीकर (वय २८, रा. संजय गांधीनगर) या तरुणाची निर्घृण हत्या झाली. सोबत राहणाऱ्या आकाश खडतकर आणि रोहित ऊर्फ गोलू निमजे या दोघांनी अनिकेतची हत्या केली असून, पोलिसांनी काही तासातच त्यांच्या मुसक्या बांधल्या.
अनिकेत, आकाश आणि गोलू हे तिघेही मित्र होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होता. आज दुपारी ४ च्या सुमारास ते गोकुल बारमध्ये दारू पीत बसले होते. तेथे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यामुळे ते बारमधून उठून भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आले. तेथे आकाश आणि गोलूने तीक्ष्ण शस्त्राचे वार करून अनिकेतची हत्या केली. अनेकांसमोर झालेल्या या थरारक हत्याकांडाने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच सक्करदऱ्याचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. अनिकेतची ओळख पटताच त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. त्याची बहीण कांचन आणि त्यानंतर अन्य नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.
दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह
अनिकेतचे वडील विजयराव कॅटरिंगचे काम करतात. तो त्यांना मदत करायचा, तसेच स्वत: कार वॉशिंग करायचा. १५ मार्चला त्याने पूनम नामक तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता.
पूनमच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे अनिकेतची हत्या त्याच कारणावरून झाली असावी, असा संशय घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र, अनिकेतसोबत राहणारे त्याचे मित्र आकाश आणि गोलूसोबत त्याचा काही दिवसांपासून वाद असल्याचे तसेच त्यांनीच अनिकेतला मोबाईल करून बोलवून घेतल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी त्या दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी अनिकेतची हत्या केल्याचे कबूल केले.(प्रतिनिधी)
आई आणि पत्नी बेशुद्ध
सर्वात आधी घटनास्थळी अनिकेतची बहीण कांचन पोहोचली. भावाची हत्या झाल्याचे कळाल्याने ती आक्रोश करू लागली. मात्र, अशाही स्थितीत तिने आपल्या आईला आणि अनिकेतच्या पत्नीला हे वृत्त सांगितले नाही. सोबतच्या नातेवाईकांनाही ती आई आणि वहिनीला काही सांगू नका, असे म्हणत आपले हुंदके रोखत होती. यावेळी तिच्या मोबाईलवर घरच्यांचे सारखे फोन येत होते. काय झाले, अशी विचारणा होत होती. शेवटी घरच्यांसोबत आई आणि पूनमलाही अनिकेतची हत्या झाल्याचे कळले. ते ऐकून त्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्या बेशुद्ध पडल्या.