नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरून भाजपने आता राज्य शासनाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मंत्र्यांविरोधात वक्तव्य केले तर तातडीने पोलीस कारवाई होते. परंतु पंतप्रधानांबाबत हिंसक वक्तव्य करणाऱ्या पटोले यांची शासनाकडून पाठराखण करण्यात येत आहे. त्यांना राज्य शासनाचे संरक्षण का, असा सवाल भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली व पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पटोले यांनी वक्तव्य करून दोन दिवस झाले असूनदेखील काहीच कारवाई झालेली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांसह मंत्री आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, रश्मी ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केल्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
देशाच्या पंतप्रधानांबाबत नेमके काय बोलायचे याचे तारतम्य नसलेले नेते हिंसक वक्तव्य करतात व त्यांना संरक्षण देण्यात येते ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. पोलिसांवरदेखील शासनाचा दबाव असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केला. जर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी आ. कृष्णा खोपडे, अनिल सोले, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, चंदन गोस्वामी, सुनील मित्रा, विजय फडणवीस हे प्रामुख्याने उपस्थित होते.