पोलिस ठाण्यामध्येच चोरी होत असेल तर कुठे जावे? २०२१ चा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यातून चोरी
By योगेश पांडे | Updated: September 25, 2025 17:31 IST2025-09-25T17:30:25+5:302025-09-25T17:31:36+5:30
Nagpur : सर्वसाधारणतः महत्त्वाचा ऐवज किंवा कागदपत्रांची चोरी झाल्यानंतर कुठलाही व्यक्ती पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेते व तक्रार नोंदविते. मात्र जर पोलिस ठाण्यातीलच दस्तऐवजाची चोरी झाली तर...?

Where should I go if there is a theft in the police station itself? 2021 complaint form Theft from the police station
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसाधारणतः महत्त्वाचा ऐवज किंवा कागदपत्रांची चोरी झाल्यानंतर कुठलाही व्यक्ती पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेते व तक्रार नोंदविते. मात्र जर पोलिस ठाण्यातीलच दस्तऐवजाची चोरी झाली तर...? नागपुरातील परिमंडळ चारच्या जुन्या उपायुक्त कार्यालयातून एका व्यक्तीचा तक्रारींचा अर्ज चोरी गेला. या संदर्भात संबंधित व्यक्तीने पाठपुरावा केल्यानंतर अखेर पोलिसांनाच पोलिस कार्यालयातून अर्ज चोरीस गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यातच नोंदवावी लागली.
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिस उपायुक्त, परिमंडळ चारचे कार्यालय अगोदर अजनी येथील कांबळे चौकात होते. मारोतराव मोते (वय ७५) यांनी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी परिमंडळ चारच्या उपायुक्त कार्यालयात फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार केली होती. प्रक्रियेनुसार संबंधित तक्रारीचा अर्ज चौकशी होत असताना तेथेच असणे अपेक्षित होते. त्यानंतर काहीच दिवसांत त्या कार्यालयात रंगरंगोटी व सफाई करण्यात आली होती.
त्यानंतर कार्यालय हे सक्करदरा परिसरात स्थानांतरित झाले व तेथील सर्व दस्तऐवजदेखील तिथेच नेण्यात आले. मोते यांनी २०२० व जून २०२१ मध्ये हुडकेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार केली होती व गुन्हादेखील दाखल झाला होता. मात्र ऑक्टोबर २०२१ च्या तक्रारीवर हवी तशी कारवाई न झाल्याने त्यांनी विचारणा केली. मात्र संबंधित अर्जच कार्यालयात नसल्याची बाब समोर आली. याबाबत शोधाशोध सुरू झाली व तत्कालिन कार्यरत कर्मचारी-अधिकाऱ्यांना विचारणा झाली; परंतु तो अर्ज कुठेच सापडला नाही. प्रशासकीय प्रक्रियेनुसार पोलिस उपायुक्त कार्यालयात एखादा तक्रार अर्ज आल्यावर तो उपायुक्तांकडे जातो व ते संबंधित पोलिस ठाण्याकडे तो अर्ज वर्ग करण्याची सूचना करतात. मात्र संबंधित अर्जच न सापडल्याने अखेर तो अर्ज कार्यालयातूनच चोरीस गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलिस कार्यालयांमधील प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरकरणी हा प्रकार अगदी 3 सामान्य वाटत असला तरी यामुळे तक्रारदाराला झालेला मनस्ताप व पोलिस यंत्रणेतील त्रुटी प्रकर्षाने समोर आल्या आहेत.