नागपूरमध्ये पावसामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान; सर्वेक्षण व पंचनामे करणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 19:07 IST2026-03-23T19:05:06+5:302026-03-23T19:07:43+5:30
Nagpur : सावनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री कोसळलेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसामुळे केळवद व जोगा तसेच परिसरातील शिवारातील कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकासह भाजीपाल्याची पिके आणि संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले.

Wheat crop damaged due to rain in Nagpur; When will the survey and Panchnama be done?
लोकमत न्यूज नेटवर्क
केळवद : सावनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री कोसळलेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसामुळे केळवद व जोगा तसेच परिसरातील शिवारातील कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकासह भाजीपाल्याची पिके आणि संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले. या पावसाला चार दिवस होऊनही कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
या पावसामुळे केळवद, रायबासा, बिडगाव, जटामखोरा, हत्तीसर्रा, कवठा, आष्टी, ढालगाव (खैरी), जलालखेडा, रामपुरी, पंढरी, नरसाळा, खापा (नरसाळा), जोगा, माळेगाव, खुर्सापार या शिवारातील कापणीला आलेला गहू, भाजीपाल्याच्या विविध पिकांचे मोठे नुकसान झाले असून, संत्रा व मोसंबीचा अंबिया बहार तसेच गावरान व कलमी आंबे गळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महेंद्र वडकी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे उभे पीक आडवे झाल्याने नुकसान झाले.
वादळ व पावसामुळे काही शेतातील गव्हाचे पीक कापणीयोग्य राहिले नाही. काहींनी त्या पिकाची कापणी व मळणी जरी केली तरी गव्हाचा दर्जा खालावला असून, ओलाव्यामुळे दाणे काळवंडल्यागत झाले आहेत. या नुकसानीची कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी माहिती देण्यात आली. मात्र, चार दिवस पूर्ण होऊनही कुणीही या नुकसानग्रस्त शेतातील पिकांची पाहणी व पंचनामा केला नाही, अशी माहिती या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
तत्काळ पंचनामे करा, भरपाई द्या
प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे तसेच राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना लगेच योग्य नुकसान भरपाई जाहीर करून ती बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काही शेतातील पीक हिरवेच
काही शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाची उशिरा पेरणी केल्याने त्यांच्या शेतातील पीक हिरवे असून, ओब्यांमधील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पावसामुळे हे पीक भुईसपाट झाल्याने ते परिपक्व होणार नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकाची आधीच कापणी व मळणी केल्याने या पिकाचे मात्र फारसे नुकसान झाले नाही.