शंभर वर्षात नेतृत्व उभे करू शकले नाही हा संघाचा पराभव
By कमलेश वानखेडे | Updated: June 14, 2025 17:36 IST2025-06-14T17:34:35+5:302025-06-14T17:36:16+5:30
Nagpur : उद्धव सेनेचे नेते आ. भास्कर जाधव यांची टीका

The RSS's defeat is that the RSS has not been able to build leadership in a hundred years.
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत्न्यूज नेटवर्क
नागपूर : विरोधी पक्षाचे आमदार, खासदाराबद्दल अफवा पसरवणे आणि भाजप बद्दल लोकांचे प्रेम किती वाढले असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे झाली. मात्र, त्यानंतरही त्यांच्या विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी ते उभे करू शकले नाही, हा त्यांचा पराभव आहे, अशी टीका उद्धव सेनेचे नेते आ. भास्कर जाधव यांनी केली.
नागपूर महापालिकेच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवनात शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, संघ हा नेहमीभाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचा असो, सर्वपक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचे. राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे. ही दुहेरी नीती आता लोकांच्या लक्षात यायला लागली आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. पूर्वी महाराष्ट्र हा दोन गुजराती नेत्यांकरिता पाहिजे होता. आता ते तीन झालेले आहेत. पण भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही.
दोन भावांच्या एकत्र येण्याने भाजप घाबरली
उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येऊ नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल याचा विचार भाजप करत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मतं या दोन भावांना मिळतील, अशा पद्धतीचा सर्वे आहे. त्यामुळे भाजप घाबरलेली आहे, असेही जाधव म्हणाले.