नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या ट्रेनवर होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे एकीकडे प्रवाशांत दहशत निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत अशा प्रकारच्या १२ हजारांवर घटना घडल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अशा घटना रोखण्याची जबाबदारी असलेल्या रेल्वेच्या यंत्रणांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात 'त्या' उपाययोजना 'ट्रॅक लेवल'वर आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या आठवड्यात कल्याण रेल्वे स्थानकाजवळ एका प्रेमभंग झालेल्या तरुणाने वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केली. तत्पुर्वी कळमना आणि कामठीजवळ अशीच दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. शुक्रवारी बदलापूर लोकलवर समाजकंटकाने दगडफेक केल्याने एका महिलेला डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आले. यामुळे धावत्या गाड्या आणि दगडफेकीच्या घटनांसोबतच 'रेल्वे क्राईम'चा विषय जोरदार चर्चेला आला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत (२०२१ ते २०२५) देशभरात रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या एकूण १२ हजार, १५७ घटना घडल्या. या सर्वांची नोंद रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस (जीआरपी)ने केली असून या दोन्ही यंत्रणांनी दगडफेक करणाऱ्या एकूण ८ हजार, ४४१ आरोपींना अटक केली आहे.
घडलेल्या घटना आणि अटकेतील आरोपींची आकडेवारी लक्षात घेतली तर सुमारे ३० टक्के आरोपी अजूनही रेल्वे पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे स्पष्ट होते.दुसरे म्हणजे, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्या जात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून आणि सुरक्षा यंत्रणांकडून जीव ओतून सांगितले जात असले तरी वास्तव मात्र तसे नाही, ही बाबही या आकडेवारीतून स्पष्ट होते.
ब्लॅक स्पॉट्सवर नियमित गस्त
या सबंधाने आरपीएफ आणि जीआरपीकडे विचारणा केली असता अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी संवेदनशील भाग आणि ब्लॅक स्पॉट्सवर नियमित गस्त घातली जाते, अशी माहिती त्यांनी दिली. रेल्वे रुळांजवळील संशयास्पद वस्तू हटवण्यासाठी विशेष मोहीमा राबवल्या जातात. स्थानिक नागरिकांना जागरूक करून संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
"अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. शिवाय आरपीएफकडून विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, ट्रॅक शेजारच्या वस्त्या, गावातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क करून त्यांना गांभिर्य लक्षात आणून दिले जात आहे. समाजकंटकावर नजर ठेवून त्यांना परावृत्त करण्याचे तसेच गुन्हेगारांची तातडीने माहिती देण्याचेही आवाहन केले जात आहे."- दीपचंद्र आर्य, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, एसईसीआर, नागपूर
Web Summary : Train stone-pelting incidents are terrorizing passengers. Despite railway's safety claims, over 12,000 incidents occurred in five years. Arrests are made, but concerns over security remain. Increased patrolling and public awareness campaigns are underway to curb this menace.
Web Summary : ट्रेनों पर पथराव की घटनाओं से यात्री दहशत में हैं। रेलवे के सुरक्षा दावों के बावजूद, पाँच वर्षों में 12,000 से अधिक घटनाएं हुईं। गिरफ्तारियाँ हुईं, लेकिन सुरक्षा को लेकर चिंता बनी हुई है। इस खतरे को रोकने के लिए गश्त और जागरूकता अभियान जारी हैं।