राज्यात एप्रिलमध्ये होणार एसआयआर; निवडणूक विभाग लागला तयारीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:16 IST2026-03-06T18:14:47+5:302026-03-06T18:16:10+5:30
Nagpur : महाराष्ट्रात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) एप्रिलमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कारवाई करून मतदार याद्या तपासून घेण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

SIR to be held in the state in April; Election Department starts preparations
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) एप्रिलमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कारवाई करून मतदार याद्या तपासून घेण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे आहे. यांनी याला दुजोरा दिला.
देशात एसआयआरवरून चांगलाच वाद निर्माण झाला असून, याला विरोधी पक्षांकडून विरोध होत आहे. बिहारमध्ये प्रथम ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी लाखो मतदार यादीतून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप झाला होता. पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याला उघड विरोध केला आहे. काही ठिकाणी बीएलओंनी यावरून आत्महत्या केल्याचेही आरोप झालेत. आता ही प्रक्रिया महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने याबाबतचे स्पष्ट संकेत जिल्हा प्रशासनाला दिलेत.
आयोगाने दि. ३ डिसेंबर २००२ची मतदार याची ही पाया ठेवली आहे, तर ३० ऑक्टोबर २०२४ ची विधानसभेतील मतदार यादी ही अंतिम धरण्यात येणार आहे. दोन्ही मतदार यादीत नाव असल्यास संबंधितास फक्त एक अर्ज नमुना भरून द्यावा लागणार आहे. २०२४ च्या यादीत नाव नाही अशा मतदारांच्या आई-वडिलांपैकी कुणाचे तरी मतदार म्हणून २००२ च्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. संबंधितास रहिवासी पुरावा द्यावा लागणार आहे. दोन्ही यादीत नाव नसेल तर सुनावणी घेऊन नात कापण्यात येणार असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मतदार यादीतील अस्पष्ट फोटो, दुबार नाव, पत्ता, फोटो, लिंग असणाऱ्यांची नावे शोधण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
दीड महिन्याची मुदत
आयोगाकडून एसआयआर पूर्ण करण्यासाठी दीड महिन्याची मुदत देण्यात आली असली तरी या कामाला दोन महिने लागणार असून, तशी मुदत दिली जाईल, असेही सांगितले जाते.