लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून आता तो ढोंगी ‘सेक्युलर’ पक्ष झाला आहे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
जर शिवसेना हा ‘सेक्युलर’ पक्ष असता तर काहीच हरकत नव्हती. मात्र त्यांच्या ‘सेक्युलर’वादामध्ये ढोंगीपणा आहे. भाजपाने मुस्लिमांचे मत मिळावे यासाठी तुष्टीकरणाचे राजकारण केले नाही. ‘सबका साथ-सबका विकास’मध्ये मुस्लिमदेखील येतात. मात्र शिवसेना कुठे ना कुठे मुस्लिमांच्या मतांसाठी व्होटबँकेचे राजकारण करत आहे, असे फडणवीस म्हणाले.
राज्यात विधान परिषदेच्या निवडणूकांत भाजपला चांगले यश मिळेल. प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते व आम्हाला विश्वास आहे की या परीक्षेत आम्ही पास होऊ. विधान परिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसते. काही ना काही परिणाम नक्कीच होत असतो व तो आपल्याला पहायला मिळेल, असे वक्तव्यदेखील त्यांनी केले.
पदवीधर मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये बराच घोळ दिसतो आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे गायब आहेत. एकाच घरातील दोघांचे नाव आहे व दोघांचे नाही. निवडणूक आयोगाला या प्रणालीत सुधारणा करावी लागेल. अर्ज भरल्यानंतर संबंधित व्यक्तीची चाचपणी झाल्यानंतर नाव आलेच पाहिजे. ती जबाबदारी आयोगाने घेतलीच पाहिजे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.